Kishor Kadam Shared A Post : अभिनेते किशोर कदम हे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांत व नाटकांत काम केलं आहे. अभिनयासह त्यांना कवितांचीही आवड आहे, त्यामुळे त्यांना सौमित्र या नावानेही संबोधलं जातं. अशातच त्यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. परंतु, या पोस्टमधून त्यांनी त्यांच्या राहत्या घराला धोका निर्माण झाल्याचं म्हटलं आहे.

किशोर कदम यांनी पोस्ट शेअर करत थेट मुख्यमंत्र्यांना तसेच इतर राजकीय नेत्यांना मदतीचे आवाहन केले आहे. या पोस्टमधून त्यांनी त्यांच्या घरासंबंधित गोष्टी नमूद केल्या असून त्यांच्यासह त्यांच्या सोसायटीतील इतर काही लोकांच्या घरालाही धोका निर्माण झाल्याचं यामधून सांगितलं आहे. फेसबूक पोस्ट करत यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, “नमस्कार! मी किशोर कदम. गेली तीस-पस्तीस वर्ष प्रामुख्याने मराठी आणि हिंदी रंगमंच आणि सिनेमात काम करत असून मला महाराष्ट्रात कवी सौमित्र म्हणूनही ओळख आहे आणि या दोन्ही क्षेत्रांत मला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.”

किशोर कदम यांनी मुख्यमंत्र्यांना केलं मदतीचं आवाहन

अभिनेते पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते, मंत्री, मुख्यमंत्री आणि तमाम जनतेला मी मदतीचे आवाहन करीत आहे. मेजॉरिटीच्या नावाखाली मी राहात असलेल्या सोसायटीमध्ये, रीडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने कमिटी सभासदांची दिशाभूल करून आणि प्रचंड गोंधळ घालून माझे आणि इतर तेवीस सभासदांची राहाती घरे धोक्यात आणण्याची शक्यता निर्माण करून ठेवली आहे. कमिटी मेम्बर्सनी काही महत्त्वाची कागदपत्रे, अर्धवट माहिती आणि लपवाछपवी करून अंधेरी पूर्व चकालासारख्या अत्यंत प्राईम विभागात 33(11) आणि 33(12)B या DCPR खाली आमची इमारत SRA/स्लम डेव्हेलपमेंटखाली डेव्हलप करण्याचे ठरवले असल्याचे कालच आमच्या लक्षात आले आहे.”

“कमिटी चौकस नसेल, सोसायटी सभासदांच्या हिताचे पाहत नसेल, PMC आणि बिल्डरच्या चुकीच्या प्रभावाखाली असेल तर सामान्य माणसांची राहती घरे एखाद्या ट्रान्झिट कॅम्पसारखी होण्याच्या शक्यता कशा निर्माण होऊ शकतात याचे उदाहरण म्हणजे आमची (अंधेरी हवा मेहेल सोसायटी, चकाला, मुंबई 400093) सोसायटी आहे.”

किशोर कदम पुढे संताप व्यक्त करत म्हणाले, “मूर्खांच्या मेजॉरिटीचा कसा गैरफायदा घेतला जाऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. सरकारने मेजॉरिटीचा कायदा करून जे लोक चौकस आहेत, कायद्याला धरून आवाज उठवतात, अन्याया विरोधात कायद्याने लढतात त्यांचा आवाजच एका अर्थाने बंद केला आहे. मेजॉरिटीच्या नावाखाली मूर्ख लोक स्वतःच्याच पायांवर धोंडे पाडून घेतात आणि हे त्यांच्या कसे लक्षातही येत नाही याचे उदाहरण म्हणजे आमची ही सोसायटी आहे.”

“एखादा सभासद जर चौकस असेल, कायद्याला धरून प्रश्न विचारत असेल आणि कमिटी मेम्बर्सला जर त्याच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील, कमिटी मेम्बर्स स्वतः काही अभ्यास न करता पँक आणि बिल्डरवर जर आंधळा विश्वास ठेऊन काम करत असतील तर त्या एका मेम्बरला गाळून वेगळा Whatsapp ग्रुप स्थापन करून त्या एका मेम्बरला मुंबईसारख्या शहरात चक्क बायकॉट केले जाते, त्याच्यापासून सगळी महत्त्वाची माहिती लपवली जाते, त्याच्या विरुद्ध सर्व सभासदांना भरवले जाते आणि तो सभासद रिडेव्हल्पमेंटच्या विरोधात आहे असे भासवले जाते, त्याला एकटे पाडले जाते. ही एका प्रकारची शहरी एट्रोसिटीच असते, ज्यासाठी कायद्यातही काहीच तरतूद नसते ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. मुंबईसारख्या शहरात वा इतर कोठेही असे सगळे घोळ झाल्यानंतर PMC आणि बिल्डर यांच्या प्रचंड आर्थिक ताकदीसमोर वर्षानुवर्षे सामान्य माणसाला हतबलपणे लढत बसावे लागते. अशा कितीतरी केसेस आज मुंबई शहरात प्रलंबित आहेत.”

शेवटी किशोर कदम यांनी मदतीचं आवाहन करत म्हटलं की, “या गंभीर समस्येकडे शासनाला तातडीने लक्ष घालण्याची कळकळीची विनंती मी सर्वसामान्य माणसांतर्फे करीत आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी, तसेच सहकारमंत्री बाबासाहेब पाटीलजी आणि महाराष्ट्रातल्या तमाम रसिक जनतेला एका कलावंताचे घर वाचवण्याचे आवाहन करीत आहे. किशोर कदम. कवी सौमित्र.”