सुप्रसिद्ध संगीतकार, गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या जीवनावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सुधीर फडके यांच्या भूमिकेत सुनील बर्वे, तर त्यांच्या पत्नी ललिताबाई फडके यांच्या भूमिकेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे पाहायला मिळणार आहे. योगेश देशपांडे यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शनाचा सोहळा पार पडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यावेळी बाबूजींच्या गाण्याची ताकद काय असते? याचा एक प्रसंग राज ठाकरेंनी सांगितला.

राज ठाकरे म्हणाले, “आज बाबूजींवर आधारित असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. माझ्या हस्ते ट्रेलर प्रदर्शित का होतात माहित नाही. पण प्रेमापोटी होतं असेल असं मी समजतो. खरंतर योगेश देशंपाडे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की, अशा प्रकारचा बायोपिक आम्ही बाबूजींवर करतोय. खूप कमी लोक आहे; ज्यांच्यावर बायोपिक होऊ शकते. ही बायोपिक कशी झालीये याची मला कल्पना नाही. पु.ना.गाडगीळची मी एक गोष्ट सांगतो, जिकडे दागिणा दिसतो तिकडे गाडगीळ पोहोचतात हे मला नक्की माहितीये. त्याच्यामुळे उत्तम चित्रपट झाला असावा. बाबूजींचा सहवासा मला फार मिळाला नाही. समोर पाहणं हे अनेकदा झालं. म्हणजे माझ्या वडिलांशी गप्पा मारताना झालं, ब्राम्हण संघाच्या गल्लीतून जाता येता नेहमी बाबूजी दिसायचे. बाबूजींच्या घराच्या समोर एक आर्ट स्टुडिओ होता. तिथे मला लहान असताना वडील घेऊन जायचे. अप्रतिम पेटिंग असायचे. बरोबर त्याच्या समोर बाबूजी असायचे. त्यामुळे माझे वडील तिथे गेल्यावर बाबूजी खाली यायचे. त्यांच्यामध्ये काही संवाद व्हायचा, गप्पा व्हायच्या. तेवढंच पाहणं माझ्या अनुभवात आलं. त्याच्यापलीकडे आला नाही.”

हेही वाचा – Video: अडीच वर्षांनंतर मुग्धा वैशंपायनने स्वतः संगीतबद्ध केलेलं ‘राघवा रघुनंदना’ गाणं प्रदर्शित, ‘असं’ झालं चित्रीकरण

पुढे राज ठाकरे म्हणाले, “बाबूजींची गाणी काय होती? बाबूजी काय होते?, अशा प्रकारचा एक प्रसंग मला अनुभवायला मिळाला. तो म्हणजे दीदींची पंचाहत्तरी होती. त्यानिमित्ताने अंधेरी स्पोर्ट्स क्लबला कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला बरेचजण होते. मी होतो, उद्धव होता, अर्थात दीदी होत्या. पण लालकृष्ण अडवाणीजी त्या कार्यक्रमाला आले होते. प्रत्येकाचं भाषण वगैरे चालू होतं. अचानक माझा हात कोणीतरी खेचला. मी लगेच बघितलं. तर माझ्या एक जण सोडून अडवाणीजी उभे होते. मला म्हणाले, ‘इकडे ये.’ मी जवळ गेलो. मला म्हणाले, ‘दीदींना सांगशील का की, ‘ज्योती कलश छलके’ त्या म्हणतील का? मला म्हणाले त्या इतर कोणाचं ऐकतील असं वाटतं नाही.’ हा लोकांचे काय गैरसमज आहे, मला माहित नाही. मी म्हटलं, ‘प्रयत्न करतो.’ मग मी दीदींपाशी गेलो आणि म्हटलं, ‘अडवाणीजी म्हणतायत ‘ज्योती कलश छलके’च्या दोन ओळी तुम्ही म्हणाल का?’ दीदींनी हळूच अडवाणींकडे बघितलं. माईक हातामध्ये घेतला आणि ते गाणं म्हणायला त्यांनी सुरुवात केली. चार ओळी किंवा एक मुखडा त्यांनी गायला असेल. त्यांची गायला सुरुवात झाली. मी उभा होतो तोपर्यंत मधला माणूस बाजूला गेला. माझ्या मागे अडवाणीजी उभे होते. मला हुंदक्याचा आवाज ऐकून येऊ लागला. मी मागे पाहिलं तर अडवाणीजी रडत होते.”

“आमच्यात वयात अंतर इतकं की, मी विचारू शकत नव्हतो का बरं रडताय? मी ते सोडून दिलं. कार्यक्रम संपला. वर्षभरानंतर मला पुन्हा अडवाणीजींना भेटायची संधी मिळाली. मी दिल्लीला होतो. १५ वर्षांपूर्वीची ही गोष्ट असेल. त्यावेळेस हे (माध्यम) फारसे छळायचे नाहीत. कुठे चाललात? कोणाला भेटताय? काय करताय? सहज आपल्याला कोणालाही भेटता यायचं. तर मी अडवाणीजींच्या घरी गेलो. मग गप्पा वगैरे झाल्या. गप्पा झाल्यानंतर मी त्यांना विचारलं, अडवाणीजी तुम्हाला आठवतंय का, दीदींच्या पंचाहत्तरीला तुम्ही आला होता. ते म्हणाले, हो मला आठवतंय ना. तुम्ही मला दीदींना ‘ज्योती कलश छलके’ गाणं म्हणायला सांगितलं. हो म्हणे. वाईट वाटणार नसेल तर एक प्रश्न विचारू का तुम्हाला. ते म्हणाले विचाराना. तुम्ही रडलात का? ते मला म्हणाले, मी तुम्हाला आमची जुनी आठवण सांगतो. १९५२ साली रिगल किंवा कुठल्यातरी थिएटरला ‘भाभी की चुडियाँ’ लागला होता. त्यावेळेस जन संघ मुळात स्थापन झाला होता. १९५२ची ती पहिली निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये चित्रपटगृहा बाहेरून मी आणि अटलजी चाललो होतो. आम्ही बघितलं ‘भाभी की चुडियाँ’ चित्रपट लागला होता. त्यावेळेस आम्ही दोघेही निवडणुकीत पडलो होतो. आमचा अख्खा पक्ष गेला होता. तेव्हा आमच्या अंगात शक्ती नव्हती. याच्या पुढे काय करायचं समजतं नव्हतं. राजकीय पक्ष, राजकारण पुढे कसं करायचं, हे सगळं समजतं नव्हतं. आम्ही म्हटलं जाऊ देत म्हणून आम्ही त्या चित्रपटाला बसलो.”

हेही वाचा – ‘माहेरची साडी’नंतर विजय कोंडकेंचा ‘लेक असावी तर अशी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा जबरदस्त ट्रेलर

“त्या चित्रपटाला बसल्यानंतर हे जेव्हा गाणं ऐकलं तेव्हा ऐकून बाहेर पडल्यानंतर आम्हाला नवीन उर्मी आली आणि आम्ही याच्यापुढे परत कामाला सुरुवात करायची ठरवलं. तेव्हा तो पराभवाचा काळ मला आठवला. त्या गाण्यामुळे आम्हाला नवं संजीवनी मिळाली होती. म्हणून मला रडू आलं. मला असं वाटतं हे अडवाणीजींचं म्हणणं किंवा बोलणं बाबूजींच्या संगीताची, गाण्याची ताकद सांगून जातं. एखाद्या व्यक्तीला नवं संजीवनी मिळणं आणि पुन्हा कार्यास सुरुवात करायला लावणं, हिच बाबूजींची ताकद होती. मी त्यांची गाणी आजपर्यंत अनेकदा ऐकली. गातानाही ऐकलं. परंतु भेटण्याचा योग मला फार काही आला नाही. मला असं वाटतं, चित्रपट पाहताना तो भेटण्याचा योग्य सुनील बर्वेकडून यावा, अशी एक इच्छा व्यक्त करतो. दिग्दर्शक देशपांडे आणि इतर सर्व कलाकारांना मनापासून शुभेच्छा देतो. मला वाटतं नाही मला थिएटर मिळवून देण्याची गरज लागले. कळलं का? अख्खा महाराष्ट्र हा चित्रपट निश्चित पाहिलं. सर्व चित्रपटगृहात जोरात धावेल, चालणार नाही, अशी इच्छा व्यक्त करून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र,” असं राज ठाकरे म्हणाले.