Jammu Kashmir Pahalgam Terror Attack Marathi Actor Post : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी ( २२ एप्रिल ) मोठा दहशतवादी हल्ला झाला. काश्मीर येथील प्रसिध्द पर्यटन स्थळ पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केल्याची घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला असून, यामध्ये सहभागी असलेल्या कोणालाही सोडलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

पहलगाम हल्ल्यावर आता विविध स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. बॉलीवूडसह मराठी कलाकारांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. सौरभ गोखले, सई ताम्हणकर, तेजश्री प्रधान, आरोह वेलणकर, मेघा धाडे, सायली संजीव, तेजस्विनी पंडित, वैभव तत्त्ववादी अशा अनेक कलाकारांनी या हल्ल्यासंदर्भात पोस्ट शेअर करत निषेध व्यक्त केला आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेता सुव्रत जोशीने या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना एक पोस्ट लिहिली आहे. “आज काश्मीरमधून आलेली बातमी ही अत्यंत क्लेशदायक आहे! इस्त्राइलपासून ते काश्मीरपर्यंत जगभरात विविध धर्मातील धर्मांध लोकांनी मांडलेला उच्छाद… सर्व मजहब, Religion आणि धर्म वगैरे एकत्र बुडवून एकदाचा संपवावा… कारण, एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्याची ही तृष्णा कधीही न संपणारी आहे. त्यात स्वत:ला त्या धर्मातील मानणाऱ्या सूज्ञ वगैरे म्हणवणाऱ्या लोकांची अलिप्तता किंवा मूक पाठिंबा हा अधिक घातक आहे. अरुण कोल्हटकरांच्या ‘शेवटचा अश्रू’ या कवितेचीच आठवण होत आहे.” असं सांगत सुव्रतने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे मन हेलावून टाकणारे व्हिडीओ सध्या समोर येत आहे. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सध्या या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार चालू आहेत. यातील काही नागरिक हे गंभीर जखमी असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack
सुव्रत जोशीची पोस्ट ( Jammu Kashmir Pahalgam Terror Attack )

दरम्यान, २२ एप्रिलला दुपारी पहलगाम येथील बैसरन पर्वत रांगेच्या खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हा हल्ला केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा दहशतवादी हल्ला मंगळवारी दुपारी २.३० वाजता झाला. या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.