मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवलेले दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच प्रेक्षकांचे लाडके ‘लक्ष्या’ हे आजही सर्वांचे लाडके आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या विनोदाच्या बादशाहने २००४ साली निरोप घेतला. त्यांचा ‘पछाडलेला’ हा शेवटचा मराठी चित्रपट होता. आज त्यांना जाऊन २० वर्षे झाली असली, तरी प्रेक्षकांच्या मनातील त्यांचं स्थान अढळ आहे. जेव्हा जेव्हा मराठी चित्रपटांचा विषय येतो तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव आवर्जून घेतलंच जातं.

लक्ष्मीकांत बेर्डे हे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या असंख्य आठवणी प्रत्येकाच्या मनात आहेत. केवळ प्रेक्षकच नव्हे तर अनेक कलाकारही त्यांच्याबद्दलच्या आठवणी व्यक्त करत असतात. अशातच मराठी अभिनेत्री कविता मेढेकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दलची एक जुनी आठवण सांगितली आहे. कविता मेढेकरांनी नुकताच लोकशाही फ्रेंडलीबरोबर संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबरची खास आठवण सांगितली.

यावेळी कविता मेढेकर म्हणाल्या, “लक्ष्मीकांत बेर्डे आमचे खूप लाड करायचे. मला मासे खायला खूप आवडतात. त्यामुळे त्यांच्या घरून जे मासे यायचे; त्यात माझ्यासाठी आणि विजय चव्हाण यांच्यासाठी जास्तीचं जेवण असायचंच. खाण्या-पिण्याची खूप चंगळ असायची, खूप गप्पा व्हायच्या. खूप मजामस्ती करायचो. ते जेव्हा आजारी होते, तेव्हा मला इशान (मुलगा) झाला होता. त्यामुळे मी तेव्हा नाटकात काम करण्याचं थांबवलं होतं. तर एक दिवशी मला त्यांचा फोन आला आणि त्यांनी विचारपूस केली.”

यापुढे कविता यांनी त्यांना लक्ष्मीकांत बेर्डेंनी दिलेल्या सल्ल्याबद्दल असं सांगितलं की, “तेव्हा त्यांनी मला म्हटलं होतं, तू नाटकांत काम करत नाहीस. त्यामुळे लोक तुझ्याशिवाय रंगभूमी थांबली आहे असं तुला सांगण्याचा प्रयत्न करतील. तर तसं काही नाही. मी तुला एक सांगतो की, तू जो निर्णय घेतला आहेस तो अगदीच योग्य आहे. तू आता तुझ्या मुलाकडे लक्ष दे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे कविता यांनी त्यांच्याबद्दलचा किस्सा सांगताना म्हटलं, “ते आजारी होते आणि त्यांनी मला मुलाचं नाव काय ठेवलं असं विचारलं होतं आणि तेव्हा मी त्यांना अजून नाव ठेवलं नाही असं म्हटलं. इतक्यात त्यांनी मला लोकांनी नावे ठेवण्याआधी तूच पटकन नाव ठेव असं मजेशीर उत्तर दिलं होतं. तर असे होते लक्ष्मीकांत बेर्डे. मला त्यांच्याबरोबर काम करता आलं याचा खूप आनंद आहे. ते माणूस म्हणून खूपच छान होते.”