'कबीर सिंग’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री निकिता दत्ता ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. निकिताचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. ती अनेकदा सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. काही दिवसांपूर्वी निकिता वॉकला गेली असताना तिचा मोबाईल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता दत्ता हिचा मोबाईल हिसकावून चोरल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तिने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली होती. तसेच याप्रकरणी तिने तक्रारही दाखल केली होती. दरम्यान निकिताने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहित माहिती दिली होती. याबाबत ती म्हणाली, "मला तुमच्या सर्वांसोबत एक घटना शेअर करायची आहे. गेल्या काही दिवसांपासून मी कठीण काळातून जात आहे. मी एकाच घटनेविषयी विचार करत आहे. मी वांद्रे येथील रस्त्यावर वॉकसाठी गेले होते. तेव्हा ७ वाजले होते. अचानक दोन चोर मागून आले आणि त्यांनी माझ्या कपाळावर मारले जेणेकरुन माझे लक्ष विचलित होईल. त्यानंतर त्यांनी माझ्या हातातील फोन खेचून घेतला. मला काही कळण्याआधीच ते तेथून पळून गेले." हेही वाचा : ‘त्या घटनेनंतर मला पॅनिक अटॅक येऊ लागले’, ‘कबीर सिंग’मधील अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत "त्यानंतर ३ ते ४ सेकंद मला काय झाले कळाले नाही. माझ्या आजूबाजूला असणारी माणसे खूप चांगली होती. त्यांनी माझी मदत केली. या घटनेनंतर मला पॅनिक अटॅक येऊ लागले. माझे नशीब खूप चांगले आहे की त्यांनी मला प्यायला पाणी दिले. त्यानंतर मी वांद्रे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. लोकांना जागरुक करण्यासाठी मी ही पोस्ट लिहिली आहे. मला आशा आहे अशी घटना पुन्हा कुणासोबत घडणार नाही," असे निकिताने या पोस्टद्वारे सांगितले होते. दरम्यान या घटनेनंतर अवघ्या १५ दिवसात निकिताचा फोन चोरणाऱ्या चोरांना पोलिसांना अटक केली आहे. सध्या पोलीस या सर्वांची चौकशी करत आहे. याच चोरांनी तिचा फोन चोरला आहे की नाही, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.