मुमताज यांनी अगदी लहान वयातच चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी काही वर्षे बॅकग्राउंड डान्सर आणि सहायक अभिनेत्री म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना मुख्य भूमिका मिळू लागल्या. त्यांना मुख्य भूमिकेत घेणारे पहिले चित्रपट निर्माते व्ही. शांताराम होते.

१९६७ मध्ये आलेल्या ‘बूंद जो बन गई मोती’ या चित्रपटात जितेंद्र यांच्याबरोबर मुख्य भूमिकेसाठी त्यांची निवड झाली होती. पण, मुमताज यांच्या कास्टिंगवर जितेंद्र खूश नव्हते. ही माहिती खुद्द मुमताज यांनी अलीकडेच ‘रेडिओ नशा’ला दिलेल्या मुलाखतीत उघड केली.

‘बूंद जो बन गई मोती’ या चित्रपटात मुमताज यांच्या प्रवेशावर जितेंद्र यांनी आक्षेप घेतला होता. मुमताज यांनी सांगितले की, एक वेळ अशी आली होती जेव्हा व्ही. शांताराम यांना जितेंद्र यांना सांगावे लागले की, जर ते मुमताजबरोबर काम करण्यास तयार नसतील, तर ते चित्रपट सोडू शकतात. ‘रेडिओ नशा’शी बोलताना मुमताज यांनी सांगितले की, व्ही. शांताराम यांची मुलगी राजश्री हा चित्रपट करणार होती; परंतु तिचे लग्न होणार असल्याने तिनं हा चित्रपट सोडला. तिच्या जागी व्ही. शांताराम यांनी मला घेण्याचा निर्णय घेतला. कारण- त्यांना वाटले की, मी या भूमिकेसाठी सर्वोत्तम आहे.

मुमताज यांनी सांगितले, “माफ करा जीतू; पण हे तुम्हीच म्हणालात. ते म्हणाले की, तुम्ही मुमताजला का घेत आहात? शांताराम म्हणाले की मला वाटते की, तिच्यात नायिका बनण्याचे सर्व गुण आहेत. ती सुंदर आहे, चांगली डान्स करते, एक चांगली अभिनेत्री आहे आणि मला ती आवडते. जीतू म्हणाले नाही, नाही. आपण दुसऱ्या कोणाला कास्ट करू शकत नाही का? त्यावर शांताराम म्हणाले की, नायिका तीच असेल. जर तुम्ही हे मान्य केले नाही, तर तुम्ही चित्रपट सोडू शकता.”

दिलीप कुमार यांचे मानले आभार

संभाषणादरम्यान, मुमताज यांनी त्यांच्या कारकिर्दीबद्दल दिलीप कुमार आणि मेहमूद यांचे आभार मानले, ज्यांनी त्यांना मदत केली. मुमताज यांनी सांगितले की, त्यावेळी कोणताही मोठा स्टार त्यांच्याबरोबर काम करण्यास तयार नव्हता; परंतु दिलीप कुमार यांनी ‘राम और श्याम’साठी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला.

मुमताज म्हणाल्या, “दिलीप कुमार यांनी माझी रीळ पाहिली आणि सांगितले की, ती सुंदर आहे आणि चांगली डान्स करते. मी तिच्याबरोबर चित्रपट करीन. मी त्यांची खूप आभारी आहे. जेव्हा त्यांनी माझ्याबरोबर चित्रपट करण्यास ‘हो’ म्हटले तेव्हाच मी अभिनेत्री बनू शकले. जर त्यांनी नाही म्हटले असते, तर मी कधीही अभिनेत्री बनले नसते. जेव्हा त्यांनी माझ्याबरोबर चित्रपट करण्यास ‘हो’ म्हटले होते. तेव्हा त्यानंतर कोणत्याही अभिनेत्याने माझ्याबरोबर काम करण्यास नकार दिला नाही. त्यानंतर सर्वांनी माझ्याबरोबर काम केले.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुमताज यांनी राजेश खन्नाबरोबरही अनेक हिट चित्रपट दिले होते. मुमताज आणि राजेश खन्ना यांनी ‘आप की कसम’, ‘प्रेम कहानी’, ‘सच्चा झूठा’, ‘अपना देश’, ‘रोटी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांत एकत्र काम केलं आहे.