अभिनेता आणि कॉमेडीयन वीर दास सध्या चर्चेत आहे, त्याचा आगामी स्टँडअप शो नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. वीर दास बऱ्याचदा त्याच्या स्टँडअप शोजमुळे किंवा वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नवीन शोच्या निमित्ताने त्याने एका मुलाखतीमध्ये त्याला आपल्या देशाबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम असल्याचं स्पष्ट केलं आहे.

“मी माझ्या देशाला नेहमीच माझ्याबरोबर घेऊन फिरतो” हे वीर दासचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने यामागचा अर्थ आणि त्याची बाजू अगदी स्पष्टपणे मांडली आहे. या मुलाखतीमध्ये वीर दास म्हणाला, “मी जुहू बीचवरील वाळू एका झिप-लॉकच्या बॅगेत भरून थेट न्यू यॉर्कला घेऊन गेलो. हीच माझ्या शोची एक संकल्पना होती. थोडी वाळू तुम्ही नेऊ शकता याची तुम्हाला परवानगी आहे. यामागचा विचार असा आहे की की जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी माझा देश माझ्याबरोबर आहे, मी जेव्हा केव्हा विनोद करतो तेव्हा मी माझ्या मातृभूमीशी जोडलेला असतो.”

आणखी वाचा : सुपरस्टार थलपथी विजय आणि त्याच्या पत्नीच्या घटस्फोटाची बातमी खोटी; निकटवर्तीयांनी केला खुलासा

वीर दासच्या बऱ्याच कॉमेडी शोजवर तसेच वेबसीरिजवर याआधी बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतला होता. त्याविषयी बोलताना वीर दास म्हणतो, “मला जो काही प्रतिसाद आणि अभिप्राय मिळतो तो खरंच चांगला आहे. माझ्या पुढच्या शोमधील जोक्स लिहिताना मी त्याकडे एक कलेचं माध्यम म्हणूनच बघतो. सध्याची परिस्थिती जरा वेगळी आहे, सध्या कुठून आणि कशापद्धतीने विरोध होईल हे सांगता येणं कठीण आहे. मी अजिबात घाबरणार नाही, मी कायम माझ्या विनोदातून तुमचं मनोरंजन करेन, माझ्या विनोदावर तुम्ही मनमुराद हसला नाहीत तर कदाचित मला भीती वाटेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२१ ‘I come from two India’s’ या अॅक्टमुळे वीर दास चांगलाच चर्चेत आला होता. या अॅक्टमध्ये त्याने भारतात त्याने पाहिलेले दोन देश आणि देशातील विषमता मांडायचा प्रयत्न केला होता. यामुळे वीर दास चांगलाच अडचणीत आला होता. सोशल मीडियावर तो चांगलाच ट्रोलही झाला होता आणि त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी तक्रारीसुद्धा दाखल करण्यात आल्या होत्या. आता ‘वीर दास : लॅंडींग’ हा त्याचा आगामी शो नेटफ्लिक्सवर चर्चेत आहे. प्रेक्षकांना तो चांगलाच पसंत पडला आहे.