‘बाहुबली २’ प्रदर्शित होऊन आता दोन आठवड्यांहूनही अधिक दिवस झाले. पण अजूनही या सिनेमाची क्रेझ काही केल्या कमी झाली नाही. या सिनेमाने आतापर्यंत १३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. सिनेमाचे संवाद, कलाकार यांच्याबद्दल प्रेक्षकांमध्ये अजूनही चर्चा रंगताना दिसतात. यातही अधिक चर्चा रंगताना दिसते ती राजमाता शिवगामी देवीची.

अभिनेत्री रम्या कृष्णनने शिवगामी देवीची व्यक्तिरेखा साकारली आहे. या व्यक्तिरेखेला रम्याने तिच्या डोळ्यांच्या अभिनयातूनच अक्षरशः जिवंत केले आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नावाजलेल्या रम्याला पाच वर्षे चित्रीत होणाऱ्या या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी भरपूर काळ द्यावा लागणार होता. याच कारणामुळे सुरूवातीला रम्या ही भूमिका करू इच्छित नव्हती. पण, नंतर दिग्दर्शक राजामौली यांच्या सांगण्यावरून तिने सिनेमाची संहिता वाचली आणि नंतर तिने या सिनेमाला होकार दिला.

रम्या सिनेमातल्या तिच्या अभिनयाचं श्रेयं दिग्दर्शक राजामौली यांना देते. याविषयी रम्या म्हणाली की, ‘मी राजामौली सरांवर पूर्ण विश्वास ठेवला. त्यांनी मला जसा अभिनय करायला सांगितला मी अगदी तसाच केला.’ सिनेमा पूर्ण झाल्यानंतर हैदराबादमध्ये सिनेमातील कलाकारांसाठी खास स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. ‘सिनेमात जेव्हा कटप्पा, राजमातेला बाहुबलीच्या निधनाची बातमी सांगतो ते दृश्य पाहताना माझ्या डोळ्यात खरंच पाणी आलं होतं. या दृश्यात कोणताही संवाद नसल्यामुळे ते क्षण अक्षरशः अंगावर येतात. संपूर्ण सिनेमात हे दृश्य माझ्या आवडीचे आहे,’ असेही रम्या म्हणाली.