मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीच्या रुपेरी पडद्यावर पुन्हा ऐतिहासिक वातावरण पाहायला मिळणार आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, मुंबई फिल्म कंपनी निर्मित आणि रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट पुढील वर्षी, महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत असून संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख यांसारखी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची फौज चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

विशेष बाब म्हणजे हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या सहा भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची अतुलनीय शौर्यगाथा ‘राजा शिवाजी’ या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. हा चित्रपट महाराष्ट्राच्या अभिमानाचा, नाट्यमय कथेचा आणि उत्कृष्ट निर्मितीचा संगम ठरणार आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठीच्या संघर्षाचा व शौर्याचा अद्भुत अनुभव देईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. सुप्रसिद्ध छायाचित्रणकार संतोष सिवन या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. तर संगीतकार अजय-अतुल यांचे संगीत या चित्रपटाला लाभणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबई आणि वाई येथे सुरू आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नाही. ती महाराष्ट्राच्याच नाही तर कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात जिवंत असलेली भावना आहे. या अलौकिक व्यक्तिमत्त्वाची महागाथा मोठ्या पडद्यावर साकारणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे. महाराष्ट्रदिनी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मला खात्री आहे की ही प्रेरणादायी कथा प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला भिडेल’, असा विश्वास रितेश देशमुख यांनी व्यक्त केला. तर जिओ स्टुडिओजच्या (मीडिया आणि कंटेंट बिझनेस – आरआयएल) अध्यक्ष ज्योती देशपांडे म्हणाल्या, ‘राजा शिवाजी’ हा केवळ एक चित्रपट नसून, प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली जाण्याचा एक अभिमानास्पद असा सोहळा आहे. भारताच्या भूमीत जन्मलेल्या काही महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी आणि असामान्य कर्तृत्व, भारतापासून ते जगापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच हा चित्रपट आमच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असून भारतीय चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकारांच्या साथीने आम्ही तो सादर करीत आहोत.’