मुंबई दूरदर्शनच्या ‘सह्य़ाद्री’ वाहिनीतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘सह्य़ाद्री हिरकणी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाचा १२ वा ‘सह्य़ाद्री हिरकणी’ पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचे प्रसारण येत्या ३० एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता ‘सह्य़ाद्री’ वाहिनीवरून करण्यात येणार आहे. गेल्या अकरा वर्षांत ११० कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला आहे.
यंदाच्या वर्षी सुमन गोरे (कचरा गोळा करणाऱ्या कामगार कार्यकर्त्यां), संध्या पुरेचा (शास्त्रीय नृत्य), उषा मडावी (जंगल संरक्षक), डॉ. माधवी खोडे (भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी), शबाना शेख (पोलीस निरीक्षक), प्रियांका मोहिते (गिर्यारोहक), वाहबीझ बरुआ (रग्बी खेळाडू), मुमताज शेख (सामाजिक कार्यकर्त्यां) यांचा ‘सह्य़ाद्री हिरकणी’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
मीरा बोरवणकर, अॅड. जाई वैद्य, ज्येष्ठ पत्रकार दिलीप चावरे, संजय आवटे, अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांच्या निवड समितीने विविध क्षेत्रांतील महिलांची या पुरस्कारासाठी निवड केली. वरळी येथील दूरदर्शन केंद्राच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास अनुप जलोटा, विजयालक्ष्मी छाब्रा, स्मिता जयकर, डॉ. निशिगंधा वाड, भरत दाभोळकर, अॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर, श्रीदेवी गोयल, मीरा बोरवणकर, रमेश भाटकर, सुचेरिता हेगडे आदी उपस्थित होते.