बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे फार चिंतेत आहे. एका बाजूला त्याचा मोठा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सध्या तो मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. तर दुसरीकडे अद्याप आर्यनला जामीन मंजूर झालेला नाही. त्यामुळे येत्या २० ऑक्टोबरपर्यंत त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे. या सर्व कारणांमुळे त्याच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणाला ब्रेक लागला आहे. या दरम्यान शाहरुखसाठी आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने शाहरुखसोबतच्या एका चित्रपटाला नकार दिला आहे. त्यामुळे त्याच्यासह चाहत्यांनाही धक्का बसला आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली यांच्या आगामी 'लायन' चित्रपटाची सध्या सिनेसृष्टीत बरीच चर्चा आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिला विचारण्यात आले होते. मात्र समांथाने शाहरुखसोबत काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल अभिनेत्री समांथा आणि नागाचैतन्य यांनी महिन्यापूर्वी घटस्फोट घेतला आहे. तर दुसरीकडे सध्या समांथाकडे अनेक चित्रपट आहे. ती त्याच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. त्यामुळेच तिने शाहरुखसोबत 'लायन' चित्रपट करण्यास नकार दिला आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान लवकरच समांथा तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. ड्रिम वॉरियर पिक्चर या प्रोडक्शन हाऊसने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत ही घोषणा केली आहे. त्यांनी समांथाचं एक पोस्टर शेअर केलं आहे. या चित्रपटात समांथा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित शांतरुबन ज्ञानसेकरन करणार आहेत. हा चित्रपट दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेलुगू आणि तमिळ भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एसआर प्रकाश बाबू आणि एसआर प्रभू करणार आहेत. सामंथा लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात असल्याचे बोललं जात आहे. समांथा-नागाचैतन्यचा घटस्फोट २००९ मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर समांथा व नागा चैतन्यची पहिली भेट झाली. त्यावेळी नागा चैतन्य कमल हासन यांची मुलगी श्रुती हसनला डेट करत होता. तर दुसरीकडे समांथा व ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ रिलेशनशीपमध्ये होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्यमध्ये चांगलीच मैत्री झाली. २०१५ मध्ये ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा हे दोघं पुन्हा भेटले तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं. ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या जवळपास ४ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे.