‘ऑपरेशन सिंदूर’मुळे बिथरलेल्या पाकिस्तानी लष्कराने गुरुवारी (८ मे) भारताच्या १५ लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या मजबूत हवाई सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानची एकूण एक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच नष्ट केले.
भारतीय सैन्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, आपले सैनिक सीमेवर तैनात असताना देशवासीयांना काळजी करण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत जम्मूचा रहिवासी असलेला कॉमेडियन समय रैना याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि जम्मूमध्ये राहणारे त्याचे कुटुंब कसे आहे हे सांगितले.
समय रैनाने जम्मूमधील त्याच्या कुटुंबाबरोबर संवाद साधला. त्यानंतर इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले, “माझ्या वडिलांनी आज रात्री जम्मूहून मला फोन केला आणि ते शुभ रात्री म्हणाले.” त्यांच्या आवाजात शांतता आणि स्थिरता होती. त्यांनी, मला झोपायला जा आणि काळजी करू नकोस, असे सांगितले. भारतीय सैन्य येथे सर्व काही हाताळत आहे. त्यांच्या आवाजातील शांततेने माझे अस्वस्थ मन शांत झाले. वडिलांशी बोलल्यानंतर मी मुंबईतील माझ्या घरातील लाईट बंद करतो आणि खिडकीचे पडदे लावतो. माझ्या खिडकीबाहेर, माझ्या शेजारच्या घरात लाईट अजूनही चालू आहेत.”
तो पुढे लिहितो, ‘मला माझ्या शेजाऱ्याबद्दल खूप कमी माहिती आहे. इथे असेच असते. मी विचार करतो की, त्याचेही कुटुंब जम्मूमध्ये आहे का, कदाचित पठाणकोटमध्ये किंवा कदाचित तो एका शूर सैनिकाचा मुलगा असेल, जो आज रात्री झोपणार नाही. तो त्याच्या वडिलांच्या फोनची वाट पाहत असेल. भारतीय सैनिक आणि त्यांच्यामागे उभे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबांबद्दल मला अत्यंत आदर आहे. शुभ रात्री, जय हिंद!
अनुपम खेर यांनी सांगितले जम्मूमधील कुटुंब कसे आहे?
जम्मूमध्ये राहणारे अनुपम खेर यांनीही तेथील त्यांच्या चुलतभावाशी बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी इन्स्टाग्रामवरील त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “माझा चुलत भाऊ सुनील खेरने जम्मूतील त्याच्या घरामधील एक व्हिडीओ मला शेअर केला होता. म्हणून मी लगेच त्याला फोन केला आणि विचारले की, तो ठीक आहे का?” त्याने हसत उत्तर दिले, “भाऊ, आम्ही भारतात राहतो आणि भारतीय सैन्य आमचे रक्षण करीत आहे. आई वैष्णोदेवी आपले रक्षण करीत आहे. काळजी करू नका. आम्ही एकही क्षेपणास्त्र जमिनीवर पडू दिले नाही. जय माता दी, भारतमाता की जय”.