मुंबईमध्ये पावसाळ्यात येणाऱ्या समस्या मुंबईकरांसाठी नवीन नाहीत. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील अनेक भागांमध्ये भरणारं पाणी, त्यामुळे सामान्य जनतेची होणारी गैरसोय आणि त्यात भर म्हणजे मुंबईच्या रस्त्यांवर असणारे खड्डे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना या समस्यांचा त्रास सहन करावा लागतो. मात्र त्यावर ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी आपल्या ट्वीटमधून याच समस्यांबाबत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. समीर विद्वांस यांनी मुंबईतील सद्यस्थितीवर केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आहे.

समीर विद्वांस यांनी मुंबईतील खड्ड्यांच्या समस्यांवर नुकतंच एक ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं, “मुंबईत रस्त्यावर भयानक खड्डे झालेत. अर्थात हे काही नवीन नाही. रोजच्या परवचासारखं प्रत्येक जण एकदा तरी हे म्हणतोच. वर्षानुवर्षे.. रस्त्यावर खड्डे असणे ह्याला आता ‘परंपरा’ मानलं पाहीजे, म्हणजे मग ती अभिमानानी जपता येईल! आणि त्यात पाठ, मान, मणका, गाडीची वाट लागणे हे आपलं योगदान ठरेल!”

समीर विद्वांस यांनी मुंबईतील रस्त्यावर असणारे खड्डे आणि त्यामुळे लोकांना कोणकोणत्या समस्यांना समोर जावं लागतं हे आपल्या ट्वीटमधून उपरोधिक भाषेत मांडलं आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये मुंबई महापालिका किंवा सरकारला उद्देशून कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पण तरीही अप्रत्यक्षपणे सरकारच्या अपयशावर टीका केली आहे.

पाहा व्हिडीओ

आणखी वाचा- VIDEO: आलिया प्रेग्नंट, फोटोग्राफर्सकडून रणबीरला शुभेच्छा; अभिनेत्याची प्रतिक्रिया चर्चेत

दरम्यान समीर विद्वांस यांच्या कामाबद्दल बोलायचं तर ते मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘धुराळा’, ‘आनंदी गोपाळ’ यांसारख्या मराठीतील सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय त्यांनी ‘समांतर २’साठी दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. अलिकडेच त्यांना ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.