छोट्या पडद्यावर काम केलेल्या प्रत्येक कलाकाराला एक ना एक दिवस चित्रपटांमध्ये काम करायचे असते. प्रत्येक कलाकाराचं मोठ्या पडद्यावर झळकण्याचं स्वप्न असतं. त्यादृष्टीने प्रत्येक कलाकार प्रयत्न करत असतो. पण काही कलाकार त्याला अपवादही असतात. त्यातली एक अभिनेत्री म्हणजे सायंतानी घोष. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काही वर्षांपूर्वी आलेल्या कास्टिंग काऊचच्या वाईट अनुभवाबद्दल सांगत तिचा निर्णय जाहीर केला आहे.

आणखी वाचा : “तुम्ही कितीही…” तारक मेहता फेम शैलेश लोढा यांचा निर्माते असित मोदी यांच्यावर निशाणा, वाद गेला विकोपाला

‘नागिन’, ‘मेरी माॅं’, ‘महाभारत’, ‘नामकरण’, ‘कर्णसंगिनी’ आणि ‘संजीवनी’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री सायंतानी घोष सध्या ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’मध्ये सिमसीमची भूमिका साकारत आहे. दैनिक भास्करला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने काही गोष्टींचा खुलासा केला. ती म्हणाली, “टेलिव्हिजन हे एक असे माध्यम आहे जे पूर्वीही स्ट्रॉंग होते आणि अजूनही आहे, कारण आजही तुम्हाला प्रत्येक घराघरात टीव्ही पाहायला मिळतो. कलाकार आजही त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी टेलिव्हिजनवर येतात, कारण टेलिव्हिजनच्या माध्यमातून कनकोपऱ्यातल्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. मला मी छोट्या पडद्यावर काम करत आल्याचा खूप अभिमान वाटतो. कथा चांगली असेल तर प्रेक्षक नेहमीच चांगला ओरतिसाद देतात.”

हेही वाचा : “विद्या बालनने मला किस…” पूजा भट्टने मौन तोडत केला मोठा खुलासा

पुढे कास्टिंग काऊचचा वाईट अनुभव तिने सांगितला. ती म्हणाली, “एकदा एका चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकांने मला त्यांच्या कार्यालयात बोलावले. त्या काळी पोर्टफोलिओ असायचे. मी माझा पोर्टफोलिओ घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. त्यांनी माझे मॉक शूटही केले. पण त्यानंतर ‘आपण हा पोर्टफोलिओ नंतर पाहू. पण थोडा वेळ घालवत एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घेऊया’, असे माझ्याकडे एका वाईट नजरेने बघत मला सांगितले. पण मला त्या मार्गाला कधीच जायचे नव्हते. त्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार दिला आणि तेथून निघून आले. त्यानंतरही मला विविध भूमिकांच्या ऑफर्स मिळत होत्या, पण मी मालिकांच्या विश्वात खूप आनंदी आहे. म्हणूनच मालिकांचं काम बंद करून चित्रपटात काहीही काम करणार नाही.”