बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने नुकतंक फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याबद्दल टीका केली आहे. तिने २०१४ पासून या पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार घालूनसुद्धा तिला हे नामांकन मिळाल्याने ती गोंधळून गेली आहे. तिच्या मते हे पुरस्कार सोहळे पूर्वनियोजित असतात आणि कोणाला पुरस्कार मिळणार हे सगळं ठरलेलं असतं. खरंतर या गोष्टी आपणही बऱ्याचदा ऐकत आलो आहोत. आमिर खानसुद्धा याच करणासाठी कोणत्याही पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावत नाही हे त्याने स्पष्ट केले आहे. बऱ्याचदा हे पुरस्कार विकत घेतल्याचेसुद्धा आरोप कित्येक अभिनेत्यांवर लागले आहेत. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याने तर चक्क उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विकत घ्यायचा प्रयत्न केला होता. त्याचबद्दल आपण जाणून घेऊया.

खुद्द शाहरुखने ही गोष्ट त्याच्या खूप जुन्या ‘आप की अदालत’मधल्या कार्यक्रमात कबूल केली आहे. शाहरुख खान त्याच्या सुरुवातीच्या काळात नकारात्मक भूमिका करण्यासाठी लोकप्रिय होता. ‘डर’, ‘अंजाम’, ‘बाजीगर’ अशा चित्रपटांमधून लोकांना शाहरुखने साकारलेला खलनायक आवडत होता. यापैकीच ‘बाजीगर’ या चित्रपटासाठी शाहरुखला फिल्मफेअरचं उत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकन जाहीर झालं होतं. त्यावेळेस शाहरुख हा तसा खूप नवीन होता आणि “सगळ्या गोष्टी आपल्याला मिळायला हव्यात” अशी एक विचित्र हाव त्याला होती. हे खुद्द शाहरुखनेच मुलाखतीत कबूल केलं आहे. म्हणून त्याने कार्यक्रमाच्या एडिटरकडे जाऊन आपल्याला उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देण्यासाठी काही पैसे त्यांच्या खिशात कोंबले. एडिटरने त्याक्षणी शाहरुखने दिलेले पैसे नाकारले. शाहरुखला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला खरा पण तो त्याने दिलेल्या पैशांमुळे नव्हे तर लोकांच्या प्रेमापोटी. याच मुलाखतीत शाहरुखने त्याने केलेल्या कृत्याची लाज वाटली असं म्हणत चूक कबूल केली.

त्यानंतर काही वर्षांनी आलेल्या ‘DDLJ’साठी पुन्हा शाहरुखचं नाव नामांकन यादीत आलं. याचवर्षी राम गोपाल वर्मा यांच्या ‘रंगीला’ चित्रपटात टपोरीची भूमिका करणाऱ्या आमिर खानलाही नामांकन होतं. खरं बघायला गेलं तर तेव्हा लोकांची पसंती ही आमिर खानला होती. पण त्यावर्षीदेखील उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा शाहरुखलाच जाहीर झाला. असं म्हणतात की याच घटनेनंतर आमिर खानने पुरस्कार समारंभांना जायचं बंद केलं. त्यावेळीसुद्धा शाहरुखने तो पुरस्कार विकत घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

आणखीन वाचा : न्यूयॉर्कच्या महापौरांनाही पडली अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ची भुरळ!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वात जास्तवेळा उत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार हा फक्त २ अभिनेत्यांनाच मिळाला आहे आहे. एक म्हणजे स्व. दिलीप कुमार आणि दूसरा म्हणजे शाहरुख खान. या दोघांनाही तब्बल ८ वेळा हा पुरस्कार मिळाला आहे. गेली ४ वर्षे शाहरुखचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आला नसला तरी यावर्षी आणि पुढच्या वर्षी मिळून शाहरुखचे ३ ते ४ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. शाहरुखचा ‘पठाण’ लवकरच चित्रपटगृहात येणार आहे.