‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्री प्रियमणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजनं प्रियमणीला बरीच लोकप्रियता मिळाली. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियमणीनं दाक्षिणात्य कलाकारांना बॉलिवूडमध्ये दिल्या जाणाऱ्या वागणूकीवर तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये चुकीच्या पद्धतीने दाखवण्यावर भाष्य केलं. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. दाक्षिणात्य कलाकारांना किंवा लोकांना बॉलिवूडमध्ये चुकीच्या पद्धतीनं दाखवलं जातं असं या मुलाखतीत प्रियमणीनं म्हटलंय.
प्रियमणीच्या मते बॉलिवूडमध्ये श्रीदेवी, हेमा मालिनी आणि रेखा यांच्या सारख्या दाक्षिणात्य अभिनेत्रींनंतर फारसं कुणी गाजलं नाही. या अभिनेत्रींनी अनेक दाक्षिणात्य भूमिका साकारल्या. आजही बॉलिवूड चित्रपटांमध्ये दाक्षिणात्य भूमिका असतात. मात्र त्यांना अशाप्रकारे दाखवलं जातं की, दाक्षिणात्य कलाकारांना व्यवस्थित हिंदी बोलता येत नाही.
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियमणी म्हणाली, ‘बॉलिवूड प्रेक्षकांमध्ये आजकाल दाक्षिणात्य कलाकार किंवा चित्रपट लोकप्रिय होत आहेत. त्यांचं अभिनय कौशल्य लोकांना आवडतंय. एकेकाळी अशाच प्रकारे श्रीदेवी, हेमा मालिनी आणि रेखा बॉलिवूडवर राज्य करत होत्या. त्यांच्यानंतर फारसं कोणी बॉलिवूडमध्ये चमकलं नाही. आपण बॉलिवूडमध्ये फक्त हिंदी बोलणाऱ्या कलाकारांना पाहतो. हे लोक दाक्षिणात्य कलाकारांची अशी प्रतिमा दाखवतात की, दाक्षिणात्य लोकांना किंवा कलाकारांना हिंदी बोलताच येत नाही. आमच्या भाषेची खिल्ली उडवली जाते. म्हटलं जातं, आइयो, कैसा जी, क्या बोलता जी. अशा प्रकारे दाक्षिणात्य कलाकारांनी बॉलिवूड चित्रपटात दाखवलं जातं.’
प्रियमणी पुढे म्हणाली, ‘अर्थात आता बऱ्याच गोष्टी बदलताना दिसत आहेत. मी बरेच चित्रपट पाहिलेत, पण त्यातल्या कोणत्याच चित्रपटात दाक्षिणात्य कलाकारांना चुकीच्या पद्धतीनं हिंदी बोलताना दाखवलेलं नाही. कदाचित हे फक्त बॉलिवूडकरांचं व्हर्जन आहे. ज्यातून त्यांनी दाक्षिणात्य कलाकारांना चांगलं हिंदी बोलता येत नाही अशी धारणा प्रेक्षकांमध्ये रुजवली आहे. कदाचित ते अशाच लोकांना भेटले असतील जे चुकीच्या पद्धतीनं हिंदी बोलतात. पण आता दाक्षिणात्य कलाकार बॉलिवूड चित्रपटात काम करत आहेत आणि यशस्वी होत आहेत.’