‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यामागचे कारण आहे अभिनेते परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’मधून घेतलेली एक्झिट. परेश रावल यांनी ते ‘हेरा फेरी ३’ चित्रपटात बाबू भय्या ही गाजलेली भूमिका साकारणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्याबाबत त्यांनी पूर्वी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमधून सांगितले होते. त्यानंतर अक्षय कुमारने त्यांना पूर्वकल्पना न देता, अचानक चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने २५ कोटींची नोटीस पाठवली असल्याचे वृत्त समोर आले आहे. अद्याप यावर अजून अक्षय कुमार किंवा परेश रावल यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘हेरा फेरी ३’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, “मला माहीत नाही, असं का झालं? कारण परेशनं याबाबत आम्हाला पूर्वकल्पना दिली नव्हती.” आता यावर अशाच स्वरूपाची प्रतिक्रिया या चित्रपटातील कलाकार सुनील शेट्टी यांनी दिली आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनील म्हणाले, “मला हे कळल्यानंतर धक्का बसला. माझी मुलं अथिया व अहान यांनी मला ही बातमी सांगितली. तेव्हा मी विचार केला की, मी परेशला मेसेज करेन. नंतर म्हटलं की, त्याला भेटून, यावर त्याच्याशी चर्चा करेन. याबाबत माझं कोणाशीही काहीही बोलणं झालेलं नाही. अक्षय कुमारलासुद्धा याबाबत काही कल्पना नव्हती.”

परेश रावल यांच्याबद्दल बोलताना सनील शेट्टी पुढे म्हणाले, “ही खूप मोठी समस्या आहे. आम्ही चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात करणार होतो. याचे प्रोमोही आम्ही शूट केले आहेत. हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे.” अनेक दिवसांपासून परेश रावल, प्रियदर्शन तसेच ‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट चर्चेत आहे. परेश रावल यांनी या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चित्रपटाच्या चाहत्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यापूर्वी ‘हेरा फेरी,’ ‘फिर हेरा फेरी’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांना पोट धरून हसवले होते. तर अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल यांच्या चित्रपटातील पात्रांचा मोठा चाहतावर्ग आहे. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती.