येत्या २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या अभिनेत्री आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट निश्चित वेळापत्रकानुसारच सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील काही दृश्य, नाव, इंटिमेट सीन यावरुन वाद निर्माण झाला होता. अनेकांनी याबाबत न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. मात्र या चित्रपटाच्या सर्व समस्या अखेर दूर झाल्या आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. येत्या शुक्रवारपासून चाहत्यांना ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचा आनंद लुटता येणार आहे.

गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेण्यात आला होता. अनेकांनी त्यात बदल करण्याची मागणी केली होती. यावर निर्मात्याने सर्वोच्च न्यायालयात माहिती देताना म्हटले की, आम्हाला शेवटच्या क्षणी या चित्रपटाचे शीर्षक बदलणे शक्य नाही. हा खटला दाखल करणाऱ्या व्यक्तीकडे गंगूबाई यांचा दत्तक मुलगा असल्याचा कोणताही पुरावा नाही. विशेष म्हणजे २०११ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला कोणीही आव्हान दिले नाही. त्यामुळे आमच्या चित्रपटात गंगूबाईंचा अपमान झालेला नाही.

‘भन्साळी प्रॉडक्शन’चे वकील अर्यमा सुंदरम यांनी केलेल्या युक्तिवादानुसार, ज्या व्यक्तीने याचिका दाखल केली आहे, त्या याचिकाकर्त्याने हा चित्रपट पाहिलेला नाही. यामध्ये गंगूबाईंच्या प्रतिमेचा आणि चारित्र्याचा अपमान करण्यात आलेला नाही. त्यापेक्षा या चित्रपटात स्त्रियांच्या प्रगतीबद्दलची कथा दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटात गंगूबाईच्या पात्राचा अपमान करण्यात आला आहे, असे याचिकाकर्त्याच्या म्हणण्यामध्ये तथ्य नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात यावी.

‘झुंड’मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो चर्चेत, नागराज मंजुळेंवर होतोय कौतुकाचा वर्षाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावडी’ हा चित्रपट मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानेच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिका साकारताना दिसणार आहे.