छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांच्या यादीतील एक मालिका म्हणून आई कुठे काय करते ला ओळखले जाते. या मालिकेच्या प्रमुख भूमिकेत झळकणारी अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर नेहमीच काही ना काही कारणांनी चर्चेत असते. मधुराणी प्रभुलकरला नुकतंच ठाणे महानगरपालिकेतर्फे दिला जाणारा ‘ गंगा जमुना’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यानिमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
मधुराणी प्रभुलकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यात तिने याबद्दलची माहिती दिली आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने ठाण्याबद्दल आणि या पुरस्काराबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “मला महिला सशक्तीकरणासाठी…”, राजकारणात सक्रीय होण्याबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर मधुराणी प्रभुलकरचे उत्तर; म्हणाली “कोणताही पक्ष…”
मधुराणी प्रभुलकरची पोस्ट
“जनकवी पी. सावळाराम कला समिती आणि ठाणे महानगरपालिका ह्यांच्या तर्फे दिला जाणारा ‘ गंगा जमुना’ पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद झाला. तो ही ज्येष्ठ संगीतकार श्रीधरजी फडके , ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार सर , प्रा. मंदार टिल्लू आणि निवेदिका सानिका कुलकर्णी ह्या चतुरस्त्र मंडळींसमवेत..!! कविता आणि कवी ह्यांची माझ्या हृदयात एक खास जागा असताना कवीच्या नावे पुरस्कार मिळणं हे फार काव्यत्मकच वाटतंय.
विठू माझा लेकुरवाळा, धागा धागा अखंड विणूया, पंढरीनाथा झडकरी आता, अशी पी .सावळाराम ह्यांची कितीतरी गाणी आईनी मला लहानपणी शिकवली . त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना वर्तुळ पूर्ण झाल्याचा भास झाला.
आणि ठाणे ही गेली ४ वर्ष माझी कर्मभूमी आहे. ज्या मालिकेने मला घराघरात आणि रसिकांच्या मनात पोहचवलं त्याचं शूट ठाण्यात चालतं. त्यामुळे गेली 4 वर्ष मी ठाणेकर च आहे. ठाणेकरांच्या रासिकतेविषयी आम्हा कलाकारांमध्ये कायम चर्चा असते आणि ती रसिकता अगदी खुर्चीतल्या मंडळींकडे सुद्धा आहे हे मी वेळोवेळी अनुभवलं. त्याचंच एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ठाण्याचे माजी महापौर नरेशजी म्हसके..!
एका कार्यक्रमात मी गायलेल्या गझल चा आवर्जून उल्लेख त्यांनी त्यांच्या भाषणात केला , ह्यातच सारं आलं. आशा दिलखुलास व्यक्तीकडून पुरस्कार स्वीकारणं आणखीनच संस्मरणिय होत. वर्ष सरताना , दरवर्षी मला सरलेल्या वर्षाचा मनातल्या मनात जमाखर्च मांडायची सवय आहे.
ह्या पुरस्काराने जमेची बाजू इतकी वाढली की बाकी सर्व दुखऱ्या खर्चाच्या बाजू दिसेनश्याच झाल्या. माझ्या संपूर्ण प्रवासात मला साथ देणाऱ्या, प्रेम देणाऱ्या, मला सांभाळून, समजून घेणाऱ्या, माझ्या चूका दाखवत मला घडवणाऱ्या प्रत्येकाला आणि प्रत्येकीला मी हा सन्मान अर्पण करते”, असे मधुराणी प्रभुलकरने म्हटले आहे.
आणखी वाचा : अरबाज खान तीन दिवसांनंतर करणार दुसरं लग्न? कोण आहे त्याची होणारी पत्नी? जाणून घ्या
दरम्यान सध्या ‘आई कुठे काय करते’ ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय ठरली. या मालिकेत गृहिणी ते स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहत आर्थिकरित्या सक्षम झालेल्या अरुंधतीचा प्रवास प्रेक्षकांना खूप आवडत आहे. त्यामुळे या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रेम देताना दिसत आहेत. या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकरचा तर खूप मोठा चाहता वर्ग आहे.