‘आई कुठे काय करते’ ही मालिका कायमच प्रसिद्धीझोतात असते. या मालिकेत काम करणारे कलाकार सतत विविध कारणांमुळे चर्चेत असतात. या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी श्री माधवराव गोवलकर गुरुजींसाठी भूमिकेसाठी ऑडिशन दिल्याचा किस्सा सांगितला आहे.

मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ते श्री माधवराव गोवलकर गुरुजींची व्यक्तिरेखेत पाहायला मिळत आहे. नुकतंच त्यांनी याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : नागराज मंजुळेंनी मराठी भाषेबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले “मराठीवर प्रभुत्व असणारी…”

मिलिंद गवळी यांची पोस्ट

“मागच्या आठवड्यात कोणाचातरी फोन आला, ते म्हणाले एका चित्रपटासाठी श्री. माधवराव गोवलकर गुरुजींच्या भूमिकेसाठी तुम्ही ऑडिशन द्याल का, ऑडिशन म्हटलं की मी आधीच नाही म्हणून सांगतो, पण ऑडिशन कोणासाठी ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोविलकर गुरुजी यांच्या भूमिकेसाठी, (माधव गोळवलकर हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ . हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे द्वितीय सरसंघचालक होते. इ.स. १९४० – इ.स. १९७३ श्रीगुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते. श्रीगुरुजी सर्वार्थाने राष्ट्रऋषी होते. )

मी म्हटलं देतो ऑडिशन, ते म्हणाले getup वगैरे ची काही गरज नाही तुम्ही सेल्फ टेस्ट मोबाईलवर शूट करून पाठवा, पण मला तो गेटअप करावासा वाटला म्हणून मग मी आमचे मेकअप मन समीर म्हात्रे यांना म्हटलं सुट्टीच्या दिवशी आपण गुरुजींसारखा गेटअप करायचा प्रयत्न करूया.

सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत आम्ही ती ऑडिशन शूटिंग संपवली, त्या कास्टिंगच्या गृहस्थाला तो व्हिडिओ पाठवून दिला, चार दिवसांनी त्याचा मेसेज आला की गुरुजींच्या भूमिकेसाठी तुमची निवड झाली नाही. Rejection हे माझ्यासाठी काही फार नवीन नाही आहे,आणि कलाकार म्हटलं की रिजेक्शन हा त्याच्या नशिबाला जडलेला प्रकार आहे. पण निदान चार तास का असेना अशी भूमिका जगायला मिळाली हे पण एक कलाकार म्हणून माझं भाग्यच आहे असे मी समजतो.

एका आयुष्यामध्ये इतके विविध आयुष्य जगायला मिळणं हे फक्त एका कलाकाराच्याच भाग्यात असतं. माझ्या भाग्यात होतं म्हणून “ आई कुठे काय करते “ मालिकेमधली अनिरुद्ध देशमुख ची भूमिका अजूनही जगतो आहे.

नाहीतर आयुष्यामध्ये कधी त्याच्यासारखं तिरसट वागता आलं असतं, किती कमी कलाकारांच्या वाटेला अशी , इतक्या विविध छटांनी भरलेली भूमिका येत असेल”, अशी पोस्ट मिलिंद गवळी यांनी केली आहे.

आणखी वाचा : “खरंतर छत्रपतींचा मावळा…” ‘रावरंभा’ चित्रपटातील नकारात्मक भूमिकेबद्दल कुशल बद्रिकेच्या पोस्टने वेधलं लक्ष

दरम्यान मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यामुळेच ते घराघरात पोहोचले.