अभिनेता मंदार जाधव व अभिनेत्री गिरीजा प्रभू ही जोडी मराठी टेलिव्हिजनवरील सुपरहिट जोडी आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. या दोघांनी पहिल्यांदा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून एकत्र काम केलं होतं. त्यांची ही मालिका तब्बल चार वर्षं सुरू होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि आता ही जोडी पुन्हा एकदा नव्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

‘कोण हातीस तू काय झालीस तू’ या मालिकेमध्ये ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. तर मंदार जाधव व गिरीजा प्रभू गेली ४-५ वर्षं एकमेकांना ओळखत आहेत. ४ वर्षं एकाच मालिकेत एकत्र काम केल्यामुळे आता या दोघांमध्ये चांगली मैत्री झालेली पाहायला मिळते. अशातच नुकतच मंदार जाधवने त्याच्या व गिरीजाच्या मैत्रीबद्दल एका मुलाखतीमध्ये वक्तव्य केले आहे. ‘तारंगण’ला दिलेल्या मुलाखतीत मंदारने गिरीजाचं भरभरून कौतुक केले आहे.

या मुलाखतीमध्ये गिरीजाबद्दल बोलताना तो म्हणाला, “गिरीजा ही खूप चांगली अभिनेत्री व नर्तिका आहे. गिरीजा माझ्यापेक्षा लहान आहे. त्यामुळे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही तिची पहिलीच मालिका असली तरी तिनं गेल्या काही वर्षांमध्ये स्वत:वर खूप मेहनत घेतली आहे. खूप गोष्टी ती शिकत असते. आता या मालिकेसाठीसुद्धा तिनं लाठीकाठी असो, इतर स्टंट असो या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. तिच्यामध्ये शिकण्याची वृत्ती आहे आणि त्यामुळे ती एक उत्तम अभिनेत्री म्हणून घडत आहे हे पाहून मला खूप आनंद होतो.

पुढे त्यांच्यातील केमिस्ट्रीबद्दल बोलताना तो म्हणाला, “आम्ही खूप चांगले मित्र आहोत. एकमेकांना आता चांगलं ओळखतो. एकमेकांबद्दलच्या बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. एकमेकांवर विश्वास असल्यानं आमची मैत्री इतकी चांगली झाली आहे आणि म्हणूनच टेलिव्हिजनवर आमची केमिस्ट्री इतकी छान वाटते आणि ती लोकांना आवडते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ ही मालिका २८ एप्रिलपासून सुरू झाली आहे. या मालिकेत मंदार-गिरीजा यश-कावेरी ही पात्रे साकारत आहेत. तर मालिकेत यशचं मोठं कुटुंब असल्याचं पाहायला मिळतं. याउलट कावेरी कोकणात तिच्या बाबांबरोबर राहणारी एक साधी, भोळी मुलगी असते. त्यामुळे आता यश-कावेरी यांचं नातं कसं खुलणार, त्यांची प्रेमकहाणी कधी सुरू होणार हे पाहणं रंजक ठरेल