‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका आहे. सप्टेंबर २०२२ रोजी सुरू झालेल्या या मालिकेने आता लोकप्रियतेची एक वेगळी उंची गाठली आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपआपले पात्र उत्तमरित्या निभावलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही ती पात्र आपलीशी वाटतं आहेत. पण अशातच एका नेटकऱ्याने मालिका बंद करण्याची मागणी केली आहे; ज्यावर अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी संतापून चोख उत्तर दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील अभिनेत्रींनी एक मजेशीर व्हिडीओ केला होता. या व्हिडीओत ऐश्वर्या नारकरांसह तितीक्षा तावडे, अमृता सकपाळ, एकता धनगर होत्या. याच व्हिडीओवर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली की, तुमच्या हावभावा सारखीच तुमची मालिका झाली आहे. आधी आम्ही न चुकता मालिका पाहायचो. आता नाही पाहत. कारण चांगल्या मालिकेची माती केली आहे. आता ओटापत घ्या. नेटकऱ्याच्या या प्रतिक्रियेवर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “तुम्ही बघत नाही हे उत्तम आहे. मालिकेवर १०० कुटुंब अवलंबून असतात. त्यांच्याशी तुम्हाला काही घेण-देण नसेल तरी आम्हाला आहे. त्यामुळे तुम्ही टीव्ही बंद केलात तर जास्त बरं. मालिका बंद व्हायची तेव्हा होईल.”

हेही वाचा – Video: अज्या परत आला! ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेतून नितीश चव्हाण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस, पाहा दमदार प्रोमो

ऐश्वर्या नारकऱ्यांच्या या उत्तरावर दुसरा नेटकरी म्हणाला, “प्रेक्षकांचा आदर करा.” यावरही अभिनेत्री स्पष्टच म्हणाल्या, “आम्ही आदर करतोच. पण ज्यांना हे माहित नाही की, १०० कुटुंब मालिकेवर जगतात. ही एक इंडस्ट्री आहे. दैनंदिन मालिका हे कमवण्याचं माध्यम आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तुमचा टीव्ही बंद करा. हाच उपाय आहे. त्या कुटुंबाच्या उपासमारीचं कारण बनवण्याऐवजी तुम्ही टीव्ही बंद करा. प्रेक्षक म्हणून तुम्ही आम्हाला गृहीत धरू नका. तुम्ही देखील इंडस्ट्रीचा आदर केला पाहिजे.” ऐश्वर्या नारकरांच्या या उत्तराने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – “मला वाईट वाटतंय…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची अमोल कोल्हेंच्या अभिनय क्षेत्रातील ब्रेकविषयी प्रतिक्रिया, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत ऐश्वर्या नारकरांनी रुपाली म्हात्रेची भूमिका साकारली आहे. या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. याशिवाय या मालिकेत अभिनेत्री तितीक्षा तावडे, अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, मुग्धा गोडबोले-रानडे, रजनी वेलणकर, जान्हवी किल्लेकर, अमृता रावराणे, अनिरुद्ध देवधर, प्रशांत केणी, असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.