एखाद्या मालिकेत किंवा चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना बरेचदा प्रेक्षकांकडून विचित्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागतो. मालिकेत किंवा चित्रपटात नकारात्मक भूमिका करणारे कलाकार प्रत्यक्षातही असेच असावेत, असा समज प्रेक्षक करतात. त्यामुळे कलाकारांना अनेकदा टीका व नकारात्मक प्रतिक्रिया श्न् कराव्या लागतात. अशाच टीकांचा सामना अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनाही करावा लागला होता.
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची झी मराठीवर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ प्रेक्षकांच्या भेटीस येत होती. या मालिकेत ऐश्वर्या नारकर नकारात्मक भूमिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत होत्या. मालिकेत त्यांचं रुपाली हे एक नकारात्मक पात्र होतं. याआधी त्यांनी कधीही नकारात्मक भूमिका केलेली नव्हती. त्यामुळे ऐश्वर्या यांच्या प्रेक्षकांसाठी त्यांना नकारात्मक भूमिकेत पाहणं कठीण होतं.
याबद्दल ऐश्वर्या नारकरांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘3S Talk’ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या नारकर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील नकारात्मक भूमिकेबद्दल असं म्हणाल्या, “मी ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका केली, ती आयरीस या निर्मिती संस्थेबरोबर केली होती. त्यांच्याबरोबर मी आधी दोन-तीन मालिका केल्या. त्यांच्याबरोबर काम करताना एक कौटुंबिक वातावरण असतं. त्यामुळे मी या भूमिकेसाठी फार विचार केला नाही.”
यापुढे त्यांनी सांगितलं, “मी याआधी सोज्वळ, सोशीक आणि त्याच त्याच प्रकारच्या भूमिका केल्या होत्या. त्यामुळे एक कलाकार म्हणून मला एक वेगळी भूमिका हवी होती. त्यात रुपाली हे आकांडतांडव करणारी अशी भूमिका नव्हती. तिच्या स्वभावातलाच एक नकारात्मक अंग या भूमिकेतून मला करायला मिळणार होतं. प्रेक्षकांनी मला सुरुवातीला या भूमिकेत स्वीकारलंच नव्हतं. सोशल मीडियावर मला सुरुवातीला खूप वाईट कमेंट्स आल्या होत्या.”
यापुढे ऐश्वर्या यांनी प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांबद्दल असं म्हटलं, “यांचा अपघात होऊन या मरत का नाहीत? यांचं हे काय चाललंय? या बाईला तर थोबडवावंसंच वाटतं, मारावंसंच वाटतं. अशा अनेक प्रतिक्रिया सुरुवातीला यायच्या. तेव्हा माझं असं झालं की, मी एवढं काय वाईट केलं आहे? मी मनातून अशी नाहीच आहे. त्यामुळे सुरुवातीला हे कळण्यातच मला दोन-चार महीने गेले.”
यानंतर त्या म्हणाल्या, “पण काही दिवसांनी मला जाणवलं की, माझी रुपालीची भूमिका इतकी नकारात्मक होती की, लोकांना वाटायला लागलं की, ही ऐश्वर्याच आहे. त्यांना मी खरी कशी आहे ते माहीतच नाही. मालिकेत दिसणारी बाई ही प्रत्यक्षातही अशीच आहे. तर मला ते फार अंगावर आलं होतं. मग मला कळायला लागलं की, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया या माझ्या भूमिकेबद्दलच्या आहेत.”