Bigg Boss Marathi 5 चे पर्व सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. बिग बॉसच्या घरात कोणत्या गोष्टी कधी बदलतील, याचा अंदाज कोणी लावू शकत नाही. सध्या बिग बॉसने घरातील सदस्यांना जोड्यांचा टास्क दिला आहे. यादरम्यान पंढरीनाथ कांबळे आणि अभिजीत-निक्की यांच्यातील संवादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
बिग बॉसच्या घरातील पंढरीनाथ कांबळे आणि अभिजीत सावंत-निक्की तांबोळी यांच्यातील संवादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पंढरीनाथ कांबळे अभिजीतशी बोलताना म्हणतो, “जर कॅप्टन्सी तुझ्याकडे आली आणि तुझ्याकडे जर अरबाजसारखी परिस्थिती आली, जिथे तुला तुझे कॅप्टन पद इतर सदस्याला देण्याची मुभा आहे. तर तेव्हा तू मला कॅप्टन्सी दे.” त्यावर निक्की म्हणते, “आता तर मी हक्काने म्हणेन की, माझा विचार कर.”
काय म्हणाला अभिजीत सावंत?
अभिजीत सावंत म्हणतो, “मी तुम्हाला हे सांगतो. माझ्या मनात तुमच्याविषयी खूप प्रेम आहे.” त्यावर पंढरीनाथ कांबळे म्हणतो, “ते तर तू पहिल्या आठवड्यातच सिद्ध केले आहेस. मग आता ते प्रेम संपलं का?” अभिजीत म्हणतो, “संपलं नाहीए प्रेम; पण तुम्ही तसे राहिला नाहीत.” अभिजीतच्या या विधानावर पंढरीनाथ कांबळे म्हणतो, “नाही, तसं नाही. आपल्यात ज्या गोष्टींबद्दल तेव्हा चर्चा होत होत्या, त्याच गोष्टींबद्दल आता प्रतिक्रिया आहेत.” अभिजीत म्हणतो, “एखाद्या माणसाला जर तुम्हाला त्रास द्यायचा असेल, तर दिला त्रास, संपल्या गोष्टी.”
पंढरीनाथ म्हणतो, “त्रास नाही; या गमतीच होत्या. जसं तू गमतीत म्हणायचास, तसं आम्हीही गमतीतच म्हणतोय.” अभिजीत म्हणतो, “निक्कीला जो सकाळपासून त्रास दिला जातोय, त्याचं काय, आता आम्हा दोघांनाच टार्गेट केलं जातंय.” पंढरीनाथ म्हणतो, “आपण जे वागलेलो असतो ना, त्याच गोष्टी पुन्हा आपल्याला मिळतात.” निक्की अभिजीतला “जाऊ दे ना सोड”, असे म्हणताना दिसत आहे.
दरम्यान, चौथ्या आठवड्यात पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यानंतर घरातील सदस्यांची समीकरणे बदलल्याचे पाहायला मिळत आहे. आता घरात नवीन कोणता कल्ला होणार, बिग बॉसच्या घरात अभिजीत आणि निक्की यांच्या जोडीला खरंच टार्गेट केले जात आहे का, या आठवड्यातील जोड्यांचा टास्क शेवटपर्यंत कसा जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.