दोन दिवसांपासून तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर एका हत्तिणीचा व्हिडीओ नक्कीच पाहिला असेल. या व्हिडीओमध्ये हत्तिणीला निरोप देताना संपूर्ण गावाला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये असणाऱ्या नांदणी गावातील या महादेवी हत्तिणीने ग्रामस्थांना भावविवश केले आहे. काही वर्षांपासून ही हत्तीण जैन समाजाच्या मंदिरामध्ये आनंदाने राहत होती. मात्र, ही महादेवी हत्तीण आता गुजरातच्या ‘वनतारा’मध्ये पाठवण्यात आली आहे.

या हत्तिणीला निरोप देताना समस्त गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियाद्वारे हत्तिणीला परत नांदणीमध्ये आणण्यासाठी मागणी केली जात आहे. अनेकांनी न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी अनेक जण त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी ५’फेम डीपीदादा अर्थात धनंजय पोवारनेही यासंबंधित व्हिडीओ शेअर करीत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या व्हिडीओमध्ये धनंजय असं म्हणतो, “आमच्या महादेवी हत्तिणीला न्यायालयाच्या निकालानंतर वन विभागामध्ये नेल्यानंतर जो गदारोळ इथे सुरू आहे. त्यावर मला हे सांगायचं आहे की, आपण ज्या सरकारला निवडून दिलं आहे… ते सरकार, वन विभाग आणि ‘त्या’ कुटुंबाला हे लक्षात यायला हवं की, जो विरोध केला जात आहे; तो आर्थिक गोष्टींसाठी नाही. हा विरोध भावनिक आहे. तुम्ही जे करत आहात, त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ज्या हत्तिणीला आम्ही महादेवीचा दर्जा दिला. आम्ही तिच्याकडे आदरानं, प्रेमानं आणि श्रद्धेनं बघितलं, तिला तुम्ही आता वन विभागात घेऊन गेला आहात.”

पुढे तो म्हणतो, “माणसांमध्ये राहिलेली, माणसांच्या प्रेमाची भुकेली असलेली महादेवी हत्तीण आणि तिच्या छत्रछायेखाली, तिच्या आशीर्वादाने कितीतरी लोक मोठे झाले. आज सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकमधल्या अनेक लोकांची तिच्याभोवती वर्दळ होती. हे फक्त आणि फक्त त्यांच्या प्रेमामुळेच. लाखो लोकांचा जनसमुदाय तुमच्या विरोधात उभा आहे. याचं कारण म्हणजे प्रेम आणि तिच्यावरील आपुलकी. या लाखों लोकांचा विचार करा. त्यांच्या भावनेचा विचार करा. ती हत्तीण त्यांना परत द्या.”

धनंजय पोवार इन्स्टाग्राम व्हिडीओ

त्यानंतर त्याने असे म्हटले, “खूप लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मला हजारो लोकांनी मेसेज केले आहेत की, यावर काहीतरी पर्याय असायला हवा. त्यासाठी तुम्ही बोला. लोकांना बोलण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी मला अनेकांनी सांगितलं. पण मी लोकांना व्यक्त होण्यासाठी किंवा प्रवृत्त करण्यापेक्षा हे म्हणेन की, तुम्ही जिला घेऊन गेला आहात. त्याचं कारण काहीही असो; पण हजारो लोकांच्या भावनांचा विचार करून, तुम्ही तिला परत द्या. या लाखो लोकांना तळतळाट देण्यावर भाग पाडू नका, त्याऐवजी त्यांचा आशीर्वाद घ्या.”