छोट्या पडद्यावरच्या मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीच्या आधारे ठरवली जाते. ज्या मालिकांचा टीआरपी जास्त असतो त्या मालिका वर्षानुवर्षे सुरू असतात. तर, ज्या मालिकांना अपेक्षित टीआरपी मिळत नाही अशा कार्यक्रमांना अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो.
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरच्या ‘अबीर गुलाल’, ‘दुर्गा’, ‘अंतरपाट’ अशा अनेक मालिकांनी टीआरपी अभावी अवघ्या काही महिन्यांतच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. आता याच वाहिनीवरच्या आणखी एका मालिकेने अवघ्या ७ महिन्यांत एक्झिट घेतली आहे. ‘लय आवडतेस तू मला’ ही मालिका ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर १४ ऑक्टोबर २०२४ रोजी ऑन एअर झाली होती.
‘लय आवडतेस तू मला’ या मालिकेत तन्मय जक्का आणि सानिका मोजर यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या दोघांनी सिरियलमध्ये सरकार आणि सानिका या भूमिका साकारल्या होत्या. ही मालिका ऑफ एअर झाल्यावर प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये नाराजी व्यक्त केली आहे. तर, या मालिकेची मुख्य अभिनेत्री सानिकाने इन्स्टाग्रामवर इमोशनल पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेत्री लिहिते, “सानिका तुमचा निरोप घेतेय… एक सुंदर प्रवास संपला. सानिका या भूमिकेच्या माध्यमातून एक नवीन प्रवास जगता आला. सानिकाची ताकद, शक्ती, तिच्यामधला उत्साह, तिच्या काही चुका…सगळं काही मी जगले. सानिका ही भूमिका नेहमीच माझ्या आयुष्याचा एक भाग राहील. या भूमिकेने मला हसवलं, रडवलं, वाढवलं ( सेटवर मी खूप जास्त खायचे )…आज निरोप देताना खूपच वाईट वाटतंय. पण, सानिकाच्या भूमिकेची ऊर्जा कायम माझ्याबरोबर राहील. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मी तुम्हा सर्वांची कायम आभारी आहे…हा सुंदर प्रवास संपला…लवकरच पुन्हा भेटू!”
अभिनेत्रीच्या पोस्टवर, “सानु खूप खूप छान काम केलंस तुला लवकर नवीन संधी मिळेल”, “दीदी तुमच्या मालिकेला मिस करणार”, “एवढी चांगली मालिका लवकर संपवली”, “सरकार-सानिका बेस्ट जोडी”, “सरकार व सानिकाला खूप मिस करू” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.
दरम्यान, ‘लय आवडतेस तू मला’ या मालिकेचा शेवटचा भाग ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर १८ मे रोजी प्रसारित करण्यात आला. अवघ्या ७ महिन्यांत या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला आहे.