‘कौन बनेगा करोडपती १४’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये स्पर्धक बिग बी अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन लाखो रुपये जिंकतात. एक कोटी रुपयांची रक्कमही काही स्पर्धक मिळवतात. हा शो प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवतो. काही स्पर्धक आपली काही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी या शोमध्ये सहभागी होतात. असाच एक स्पर्धक ‘केबीसी’च्या नव्या भागामध्ये सहभागी झाला होता. विक्रम खुराणा असं या स्पर्धकाचं नाव.

विक्रम सावंत याने अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या बऱ्याच प्रश्नांची अगदी अचूक उत्तरं दिली. १२ लाख ५० हजार रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं त्याने अगदी योग्य उत्तर दिलं. त्यानंतर २५लाख रुपयांसाठी विक्रमला प्रश्न विचारण्यात आला. पण यावेळी मात्र तो प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी बुचकळ्यात पडला. विक्रमने यावेळी लाइफ लाइनचा वापर करत आपल्या मित्राला फोन लावण्यास सांगितलं. त्याच्या मित्राने अचूक उत्तर दिल्यानंतर ५० लाखांसाठी त्याला प्रश्न विचारण्यात आला.

५० लाख रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं विक्रमने योग्य उत्तर दिलं. त्यानंतर त्याला ७५ लाख रुपयांसाठी बिग बींनी प्रश्न विचारला. “लाहोरच्या पहिल्या सदा ए सरहद बस प्रवासादरम्यान श्री अटल बिहारी वाजपेयी कोणत्या ज्ञानपीठ विजेत्याची कविता घेऊन गेले होते?” असा प्रश्न विक्रमला विचारण्यात आला. या प्रश्नासाठी त्याला अली सरदार जाफरी, फिराक गोरखपुरी, शहरयार, सुमित्रानंदन पंत हे चार पर्याय देण्यात आले.

आणखी वाचा – KBC 14 : १२ लाख ५० हजार रुपयांसाठी विचारलेल्या ‘या’ प्रश्नाचं स्पर्धकाने दिलं चुकीचं उत्तर, तुम्हाला उत्तर माहितीये का?

७५ लाखापर्यंत पोहोचत असताना विक्रमच्या सगळ्या लाइफ लाइन संपल्या होत्या. शिवाय या प्रश्नाचं खरं उत्तर त्याला माहित नव्हतं. म्हणूनच कोणतीच जोखीम न स्विकारता हा शो त्याने अर्धवट सोडला. या प्रश्नाचं गोरखपुरी उत्तर आहे असं त्याला वाटत होतं. पण या प्रश्नाचं खरं उत्तर अली सरदार जाफरी असं होतं.