Lagnanantar Hoilach Prem Promo : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत सध्या पार्थ-काव्या आणि नंदिनी-जीवा दोन्ही जोडप्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. जीवाच्या आयुष्यात ‘K’ अक्षरावरून नाव असलेली कोणीतरी मुलगी आहे हे सत्य काही दिवसांपूर्वीच नंदिनीला समजलेलं असतं. पण, काहीही झालं तरी संसार करायचा असा निर्णय ती घेते. जीवा छोट्या-मोठ्या गोष्टींवरून तिच्यावर चिडचिड करत असतो…शेवटी दोघांचे वाद विकोपाला जातात. जीवा विनाकारण सगळा राग नंदिनीवर काढत असतो. त्यामुळे या नात्यातून वेगळं होणं हा एकमेव पर्याय नंदिनीसमोर असतो.
आपल्या नात्याला शेवटची संधी देऊयात या आशेने जीवा नंदिनीकडे पाहत असतो. पण, जबरदस्तीने कोणतंच नातं टिकणार नाही यावर नंदिनी ठाम असते. दुसरीकडे, काव्या-पार्थच्या बाबतीत सुद्धा असंच घडतं. पार्थ पहिल्या दिवसापासून काव्याला समजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. पण, बायकोचं मन जिंकण्यात तो अयशस्वी होतो. त्यामुळे नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात या दोन्ही जोडप्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं पाहायला मिळालं.
जीवा-नंदिनी, काव्या-पार्थ यांच्याकडे त्यांचं नातं टिकवण्यासाठी शेवटचे सहा महिने आहेत. आता या सहा महिन्यात देशमुखांच्या घरात नेमके काय-काय ट्विस्ट येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यापैकीच सर्वात मोठा ट्विस्ट या आठवड्यात प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळेल.
पार्थ आणि जीवा यांच्या आई-वडिलांना मुलाच्या घटस्फोटाबद्दल समजतं. मानिनीची प्रकृची यामुळे बिघडते. जीवा यानंतर वडिलांना विचारतो, “बाबा आईच्या तब्येतीला अचानक काय झालंय?” यावर विक्रमादित्य देशमुख म्हणतात, अरे घरात घटस्फोट होतोय हे समजल्यावर आणखी काय होणार? “लग्नानंतर प्रेम होतं, घटस्फोट नाही. नात्यात दुरावे जरी आले तरी ते घरात मिटवा त्यासाठी कोर्टाची पायरी कशाला चढायची”
वडिलांचं बोलणं ऐकल्यावर पार्थ आणि जीवा या दोघांचा चेहरा पडतो. दोघेही नि:शब्द होतात…आता या घटस्फोटावर देशमुख कुटुंबीय काय उपाय काढणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत दोन्ही जोडप्यांना आता ६ महिन्यांचा कालावधी वकिलाकडून देण्यात आला आहे. आता या सहा महिन्यात हे चौघही आपला संसार कसा टिकवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. ही मालिका रोज संध्याकाळी ७ वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित केली जाते.