Lagnanantar Hoilach Prem Promo : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून पार्थ-काव्या आणि जीवा-नंदिनीच्या नात्यात दुरावा आल्याचं पाहायला मिळत आहे. मनाविरुद्ध झालेलं किती दिवस टिकणार यावर घटस्फोट घेऊन वेगळं होणं हा एकमेव मार्ग असल्याचं नंदिनी जीवाला सांगते. खरंतर, जीवाच्या स्वभावाला कंटाळूनच तिने हा निर्णय घेतलेला असतो.
पार्थ-काव्यामध्ये देखील अशाचप्रकारे वाद होत असतात. काव्या वकिलांना फोन करून परस्पर घटस्फोटाचे पेपर्स तयार करून घेते. पण, ते वकील नेमके पार्थच्या ओळखीचे निघतात आणि काव्याचं सत्य नवऱ्यासमोर उघड होतं. शेवटी आता काहीही झालं तरी काव्याला या नात्यातून मुक्त करायचं असं पार्थ ठरवतो. परिस्थितीनुसार काव्याला तिची चूक उमगते आणि ती नवऱ्याची मनधरणी करण्याचा प्रयत्न करते. दुसरीकडे जीवा सुद्धा नंदिनीची माफी मागतो.
काव्या खास साबुदाण्याची खिचडी घेऊन पार्थच्या ऑफिसला पोहोचते. पण, पार्थ ती खिचडी खाण्यास नकार देतो. नेहमी हसून-खेळून वागणाऱ्या पार्थचं तिरसट बोलणं ऐकून काव्याला अश्रू अनावर होतात. मात्र, आता मालिकेत या दोन्ही जोडप्यांच्या नात्याची एक नवीन सुरुवात होणार आहे.
नंदिनी एकटीच समुद्राकडे पाहत तिच्या भविष्याचा विचार करत असते. यावेळी जीवा मागून येतो आणि म्हणतो, “तुझं प्रेम वेडं, मला उशिराच कळलं थोडं सोडवूया का जरा आपल्या नात्याचं कोडं…” यानंतर नंदिनी त्यांच्या नात्याला आणखी एक संधी द्यायची असं ठरवते आणि जीवाला डिनर डेटला जाऊया का असं विचारते. यावर जीवाच्या चेहऱ्यावर नकळत हसु उमटतं.
तर, दुसरीकडे काव्या पार्थला सांगते, “तुम्ही मला या नात्याच्या पलीकडे भेटला असता तर, छान जुळलं असतं आपलं” पार्थ काव्याला अजिबात रडताना पाहू शकत नसतो. त्यामुळे यानंतर तो तिला आज रात्री आपण लाँग ड्राइव्हला जाऊयात का असं विचारतो. पार्थचा रुसवा अखेर दूर झालाय हे पाहून काव्या देखील खूश होते.
अशाप्रकारे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत पार्थ-काव्या आणि जीवा-नंदिनीच्या नात्याची एक नवीन सुरुवात होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. हा एपिसोड प्रेक्षकांना १५ जुलैला सायंकाळी ७ वाजता पाहायला मिळेल.