Laxmichya Paulanni : सध्याच्या काळात ओटीटीचं महत्त्व वाढत असतानाही छोट्या पडद्यावरच्या मालिका प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. गेल्या काही वर्षांत ‘स्टार प्रवाह’ वाहिनी टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. या वाहिनीवरची ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका घराघरांत विशेष लोकप्रिय आहे. अद्वैत चांदेकर आणि कला खरे यांची भांडणं, त्यांच्यामधलं अव्यक्त प्रेम याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. या मालिकेसंदर्भात महत्त्वाची बातमी नुकतीच समोर आली आहे.

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ( Laxmichya Paulanni ) या मालिकेत अक्षर कोठारी आणि ईशा केसकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अक्षर या मालिकेत अद्वैत चांदेकर ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. तर, ईशा केसकरच्या व्यक्तिरेखेचं नाव कलानिधी खरे असं आहे.

साधारण महिन्यापूर्वी अद्वैतच्या भावाची म्हणजेच राहुलची भूमिका साकारणाऱ्या ध्रुव दातारने या मालिकेतून एक्झिट घेतली होती. त्याच्याऐवजी राहुलची भूमिका आता अद्वैत कडणे साकारत आहे. ध्रुवने यासंदर्भात पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. आता ध्रुव पाठोपाठ आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीने मालिका सोडल्याचं वृत्त समोर आलं आहे. कलानिधी खरेची बहीण नयना खरे हे पात्र साकारणाऱ्या अपूर्वा सपकाळने ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतून एक्झिट घेतली आहे.

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत नयनाची भूमिका कोण साकारणार?

आता ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत अपूर्वाऐवजी नयना खरेची भूमिका अभिनेत्री सानिका बनारसवाले साकारणार आहे. सानिकाने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘स्वामिनी’ मालिकेत तिने साकारलेली जानकीबाई आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तर, ‘स्वाभिमान’ या ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत सानिकाने मेघना हे पात्र साकारल होतं. आता पुन्हा एकदा नव्या भूमिकेतून ही अभिनेत्री प्रेक्षकांसमोर येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Laxmichya Paulanni
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत नयनाची भूमिका आता साकारणार अभिनेत्री सानिका बनारसवाले ( Laxmichya Paulanni )

दरम्यान, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत अक्षर कोठारी, ईशा केसकर यांच्यासह मंजुषा गोडसे, मिलिंद ओक, दिपाली पानसरे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ही मालिका ( Laxmichya Paulanni ) ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रोज रात्री ९.३० वाजता प्रसारित केली जाते. याशिवाय टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं.