मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे कायमच चर्चेत असतात. मराठी आणि हिंदी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून सई रानडेला ओळखले जाते. ‘वहिनीसाहेब’ आणि ‘देवयानी’ या मालिकांमुळे सई रानडे घराघरात पोहोचली. मात्र नुकतंच सईने एका लोकप्रिय मालिकेतील कलाकारांबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
अभिनेत्री भार्गवी चिरमुले, समिधा गुरु, मृणाल देशपांडे आणि सई रानडे या चौघीजणी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत असतात. माहोल मुली असा एक ग्रुप त्यांनी केला आहे. यात त्या प्रमाण मराठी भाषेतील काही शब्द वऱ्हाडी भाषेत कशापद्धतीने बोलले जातात किंवा त्या शब्दांना पर्यायी वऱ्हाडी शब्द काय याबद्दल सांगताना दिसतात.
आणखी वाचा : “चला दारु उडवूया…” मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींच्या ‘त्या’ व्हिडीओची सर्वत्र चर्चा
नुकतंच या चौघींनी एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना त्या चौघींच्या मैत्रीबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी सईने भार्गवी चिरमुलेबद्दल सांगताना मालिकेत तिला झालेल्या त्रासाबद्दल सांगितले.
“मी सिनेसृष्टीत जेव्हा पदार्पण केलं, तेव्हा माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले माझ्या सहकलाकारांनी माझं रॅगिंग केलं. यात भार्गवी चिरमुले नव्हती. पण मी यामुळे इतकी कंटाळले होते की मी सिनेसृष्टी सोडून पुण्याला जाण्याच्या विचारात होते. त्यावेळी मी डिप्रेशनमध्ये होते.
मी याचा धसका घेतला होता. त्यांनतर मी इथे फ्रेंडशिप करायला आलेले नाही. मी माझं माझं काम करणार आणि बाजूला होणार, हे मी ठरवलं होत. माझे ठेवणीतील मित्र-मैत्रिणी वेगळे, माझा नवरा आहे, कुटुंब आहे, त्यात मी खूप आनंदी होते. मी पहिल्यांदा जेव्हा पुढचं पाऊल मालिकेच्या सेटवर गेले, तेव्हा तिथे अनेक वर्ष सिनेसृष्टीत काम करणारे कलाकार होते. या सर्वांसमोर आपल्याला नीट काम करायला हवं. नाहीतर इथेही आपलं रॅगिंग होऊ शकतं.
भार्गवी चिरमुलेबरोबर मी पहिली मालिका केली. त्यात ती मुख्य अभिनेत्री होती आणि मी नकारात्मक पात्र साकारत होते. त्यावेळी मला माझे इतर जे सहकलाकार आहेत, त्यांनी मला प्रचंड त्रास दिला होता. त्यावेळी मी या सर्वांपासून थोडी लांब राहायचे.
मला तेव्हा असं वाटायचं की आपलं सर्व चुकलेलं आहे. आपण माणूस म्हणून सुद्धा, अभिनेत्री म्हणूनही चुकलेलं आहे. आपलं मुंबईत येणंच मुळात चुकलेलं आहे. त्यामुळे मी काम करुया, घरी जाऊया, काहीही संबंध नको असं ठरवलं होतं. पण त्यानंतर कालांतराने माझी आणि भार्गवीची मैत्री झाली”, असे सई रानडेने म्हटले.
आणखी वाचा : प्राजक्ता माळीने सांगितली लग्नासाठीची पहिली अट, म्हणाली “तो मुलगा…”…
दरम्यान लहानपणापासूनच सईला अभिनयात रस होता. ती सुरुवातीला मॉडेलिंग करायची. वहिनीसाहेब ही सईची पहिलीच मालिका होता. या मालिकेत तिने जानकी किर्लोस्कर ही भूमिका साकारली होती. यानंतर ती कस्तुरी या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली. ‘बंड्या आनी बेबी’, स्पंदन (२०१२), पकडा पकडी (२०११) आणि लक्ष्मी तुझ्याविना (२०१४) या चित्रपटातही तिने काम केलं. तसेच ‘तारा फ्रॉम सातारा’ या हिंदी मालिकेतही ती झळकली होती.