मृणाल दुसानीस ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने तिच्या सहज अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे मृणाल चार वर्षे अभिनय क्षेत्रापासून दूर असतानाही प्रेक्षक तिला पुन्हा नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक होते. मृणालने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण ती खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली ती ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून. त्यामधील तिच्या भूमिकेला खूप मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले होते. आजही तिच्या या मालिकेला तितक्याच आवडीने पाहिले जाते.
मृणालने केवळ अभिनयानेच नाही, तर तिच्या साध्या सरळ स्वभावामुळेही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मृणालचे साधे राहणीमान प्रेक्षकांना विशेष भावते; तर काही दिवसांपूर्वी मृणालने ‘सुलेखा तळवलकर’ला मुलाखत दिली. त्यामध्ये तिने तिच्या स्वभावाबद्दल सांगितले आहे. सुलेखा यांनी तिला, “तुझ्या बालपणाबद्दल काय सांगशील? आता जशी साधी, सरळ, शांत आहेस तशीच होतीस की मस्तीखोर होतीस?”, असे विचारले. त्यावर तिने “मी साधी सरळ नाही आहे”, असे म्हटले. पुढे ती म्हणाली, “मी तापट स्वभावाची आहे. मला पटकन राग येतो आणि रागामुळे माझ्या बऱ्याच गोष्टी बिघडतात.”
पुढे तिच्या बालपणाबद्दल सांगताना ती म्हणाली, “माझं बालपण खूप छान होतं. माझे आई-बाब हेच माझं विश्व होतं. मी अंतर्मुख स्वभावाची आहे. त्यामुळे मला कधीच फार मित्र-मैत्रिणी नव्हते. माझं माझ्या बाबांशी खूप घट्ट नातं होतं. त्यामुळे मला कधी जास्त मित्र-मैत्रिणींची गरज भासली नाही. मी प्रत्येक गोष्ट माझ्या आई-बाबांना सांगितली आहे. त्यामुळे माझं बालपण खूप छान गेलं आहे. लहानपणी जे करायला हवं असतं, ते सगळं मी केलं आहे.”
दरम्यान, मृणालने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून पदार्पण केले. यानंतर तीने ‘तू तिथे मी’, ‘असं सासर सुरेख बाई’, ‘हे मन बावरे’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे यातील तिच्या प्रत्येक मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. सध्या मृणाल ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर तिच्या या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळते.