टीव्हीवरील मालिका म्हणजे प्रेक्षकांचा जिव्हाळ्याचा विषय. यामध्ये महिलावर्ग तर अगदी एकरूप होऊन जातो. मालिकेतील नायक-नायिका या आपल्या कुटुंबातीलच भाग आहेत असं अनेकांना वाटत असतं. टीव्हीवरील मालिकांमध्ये आणि प्रेक्षकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेकदा साधर्म्य जाणवतं. त्यामुळे ही प्रेक्षक मंडळी मालिकांवर भरभरून प्रेम करत असतात. मात्र अनेक वाहिन्यांवरील मालिकांमध्ये बहुतेकदा सारखेच विषय येत असतात.
टीव्हीवरील मालिका या टीआरपीच्या गणितावर आधारित असतात. त्यामुळे या टीआरपीसाठी अनेकदा मालिकांचे विषय सतत बदलले जातात आणि त्यामुळे अनेक मालिकांमधील विषयांमध्ये प्रेक्षकांना तोचतोचपणा जाणवतो. त्यामुळे याबद्दल प्रेक्षक त्यांची मतं व्यक्त करतात. मालिकांमध्ये तेच तेच दाखवलं जातं, या प्रेक्षकांच्या प्रतिकेयवर प्रसिद्ध लेखिका आणि अभिनेत्री मुग्धा गोडबोले-रानडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुग्धा गोडबले यांनी नुकताच लोकमत फिल्मीशी संवाद साधला.
या संवादात त्यांनी असं म्हटलं, “जी माणसं सोशल मीडियावर अशा कमेंट्स करतात, ती माणसं या मालिकांचे प्रेक्षकच नाहीत. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की, एक मालिका, तिचा एक भाग एका वेळेला अमेरिकामध्येसुद्धा बघतात आणि खेड्यापाड्यांमधील माणसंसुद्धा बघतात. सगळ्यांना आपला वाटेल आणि सगळ्यांना त्यांच्या जवळचा वाटेल असा विषय आणि व्यक्तिरेखा, अशा भावना या मालिकांमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो, ज्याला वैश्विक सत्य म्हणतात.”
यानंतर त्यांनी सांगितलं, “मी नेहमी म्हणते की, ‘आई कुठे काय करते’सारख्या मालिकेत एका घरातल्या ४०-४५ वर्षांच्या स्त्रीकडे झालेलं दुर्लक्ष दाखवण्यात आलं होतं. हे कमी-जास्त प्रमाणात सगळ्याच स्तरातील स्त्रियांनी अनुभवलेलं असतं. त्यांना तसं वाटत असतं किंवा त्यांनी त्यांच्या आजूबाजूला ते बघितलेलं असतं. ही वैश्विक भावना आहे. विवाहबाह्य संबंध मग ते कोणत्याही स्तरातील असूदेत, आपल्या नवरा किंवा बायकोचं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम आहे, ही भावना त्रास देणारीच असते. हीसुद्धा एक वैश्विक भावनाच आहे.”
यापुढे त्या म्हणाल्या, “एखाद्या घरात लग्न झालेली सून येते आणि सासूचा आतापर्यंतचा त्या घरातील सहभाग कमी होतो. आपल्या हातून सत्ता जाते किंवा त्याबद्दल असुरक्षितता वाटणे हीसुद्धा एक वैश्विक भावनाच आहे. त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो की, तेच तेच दाखवतात; तेव्हा दुर्दैवाने लोक तेच तेच बघत आहेत.”
यापुढे त्या म्हणाल्या, “आतापर्यंत सर्व वाहिन्यांनी, सर्व अनुभवी दिग्दर्शकांनी आणि लेखकांकडून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न झालेला आहे, झालेला नाही असं नाही. पण जेव्हा प्रेक्षक त्याच्याकडे पाठ फिरवतात किंवा ते पाहिलं जात नाही असं लक्षात येतं; तेव्हा असे प्रयत्न पुन्हा केले जात नाहीत. कारण मुळात हा एक व्यवसाय आहे. इथे कोणीही धार्मिक संस्था उघडलेली नाही.”