Maharashtrachi Hasya Jatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोचा चाहतावर्ग जगभरात पसरलेला आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत या शोमधल्या सगळ्याच विनोदवीरांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. आता या शोमध्ये दोन खास अभिनेत्री सहभागी झाल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोन अभिनेत्री म्हणजे निक्की तांबोळी व उषा नाडकर्णी, सध्या या दोघी ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या शोमुळे चर्चेत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रमोशन निमित्ताने निक्की तांबोळी व उषा नाडकर्णी या दोघीही हास्यजत्रेत आल्या होत्या.

निक्की तांबोळीने यापूर्वी ‘बिग बॉस मराठी ५’ गाजवलं असल्याने हास्यजत्रेत येऊन ती काय धमाल करणार हे पाहण्यासाठी तिचे तमाम चाहते उत्सुक होते. अखेर नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की कोकणावर आधारित असलेल्या एका स्किटमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय निक्की तांबोळी आणि उषा नाडकर्णी या दोघींनी हे स्किट सादर करताना मंचावर पारंपरिक कोकणातील गाण्यावर ठेका धरल्याचं देखील प्रोमोमध्ये दिसत आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमध्ये सर्वप्रथम प्राजक्ता माळीने या दोघींचं स्वागत केलं. कोकणासंदर्भात एक स्किट या शोमध्ये सादर केलं जाणार आहे. निक्की तांबोळी स्किट सादर करत असल्याचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. ती यात नेमकं काय म्हणतेय जाणून घ्या…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये निक्की सादर करणार स्किट

निक्की – What Happened… काय झालं?

अतुल काळे – मॅम, बघा ना… या सगळ्यांना शिमग्याला ( होळीचा सण ) कोकणात जायचंय. त्यामुळे हे लोक १० दिवस सुट्टी मागत आहेत. पण, मी यासाठी अजिबात परवानगी दिलेली नाहीये. मी सरळ नाहीच सांगितलं त्यांना म्हटलं हे माझ्या हातात नाही.

निक्की – काय तुम्ही यांना सुट्टी का नाही दिली? मी स्वत: माझ्या मावशीबरोबर शिमग्याला जातेय त्यांना ताबडतोब सुट्टी द्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निक्कीच्या या स्किटवर तिचे चाहते व नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. वनिता खरात, प्रभाकर मोरे, प्रथमेश शिवलकर, श्रमेश बेटकर यांच्यासह निक्की आणि उषा नाडकर्णी स्किट सादर करणार आहेत. दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’- कॉमेडीची हॅटट्रीक! हा शो सोमवार-बुधवार रात्री ९.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित केला जातो. आता शोमध्ये निक्की अजून काय-काय धमाल करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.