‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा सध्या महासंगम सुरू आहे. किर्लोस्करच्या कुटुंबात आदित्य-अनुष्काच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. तर दळवी कुटुंबात जयंत-जान्हवीच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. दोन्ही कुटुंब एकत्र येऊन हे भव्य लग्नकार्य पार पाडत आहेत. त्यामुळे सध्या ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी’ निवास मालिका चर्चेत आहे.

‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या महासंगममुळे कलाकार मंडळी विविध एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना दिसत आहेत. नुकताच ‘पारू’ मालिकेतील पारू म्हणजे अभिनेत्री शरयू सोनावणेने ‘मीडिया टॉक मराठी’शी संवाद साधला. यावेळी शरयूने खरं लग्न लपवण्यामागचं कारण सांगितलं.

अभिनेत्री शरयू सोनावणेने २०२३मध्ये जयंत लाडेशी लग्नगाठ बांधली होती. हे लग्न तिने वर्षभर सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी तिने लग्न केल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे चाहत्यांना सुखद धक्काच बसला होता. पण, तिने असं का केलं होतं? यामागचा खुलासा झाला आहे.

शरयू सोनावणे म्हणाली, “लग्न लपवून ठेवण्यामागे असा काही वेगळा विचार वगैरे नव्हता. पण, माझी तेव्हा एक मालिका सुरू होती. त्यामुळे उगाच माझ्या मनात विचार येऊन गेला की, मालिका सुरू आहे आणि अचानक मी लग्न केलं होतं. तर प्रेक्षक ते स्वीकारेल की नाही. त्याशिवाय कुटुंबाने निर्णय घेतला होता की, आम्ही लगेच नाही तर थोड्या काळानंतर लग्न जाहीर करू. असं करता करता पुढे ढकललं गेलं. आम्हाला असा खास दिवस मिळत नव्हता. मग एक वर्ष सरत आमच्या लग्नाचा वाढदिवस आला. त्यामुळे आमचं असं ठरलं की, लग्नाचा वाढदिवस येतो. एक वर्ष पूर्ण होतंय. त्यामुळे आपण लग्नाच्या वाढदिवशी लग्न केल्याचं जाहीर करू. लोक सगळं सेम करतात, लग्न झालं, पोस्ट केली आणि जाहीर केलं. तर मला असं होतं, ठीक आहे. आपण काहीतरी वेगळं करू. त्यामुळे आम्ही थांबलो.”

पुढे शरयू म्हणाली की, एका क्षणी आमचं असं झालं होतं की, आता वेळ आहे तर करून टाकू या. मग असं वाटलं, लग्नाचा वाढदिवस येतोय तर तेव्हाच आपण करून टाकूया. लग्नाचा पहिला वाढदिवस आला आणि तेव्हाच लग्न जाहीर केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शरयू सोनावणेचा नवरा जयंत लाडे मराठी सिनेसृष्टीत काम करत असून तो एक फिल्ममेकर, निर्माता आहे. अभिनेता उमेश कामत, पुष्कर श्रोत्री आणि स्पृहा जोशी अभिनीत ‘अ पेईंग घोस्ट’ चित्रपटाच्या निर्मातीची धुरा जयंतने सांभाळली होती. याशिवाय उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, संजय जाधव, भरत गणेशपुरे अभिनीत ‘सूर सपाटा’ या चित्रपटाची निर्मिती देखील शरयूच्या नवऱ्याने केली होती. या चित्रपटात शरयू सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.