अभिनेता प्रसाद लिमये नुकताच ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत झळकला होता. त्यामध्ये त्याने किशोर जहागीरदार ही भूमिका साकारली होती. त्यामधून तो खलनायक म्हणून प्रेक्षकांसमोर आला. त्याच्या या भूमिकेनं प्रेक्षकांच लक्ष वेधलं. मालिकेत त्यानं लीला-एजे यांच्या प्रेमकहाणीमध्ये अनेकदा अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वीच या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला.
प्रसाद लिमयेनं नुकतीच ‘मराठी मनोरंजन विश्व’ला मुलाखत दिली. यावेळी त्यानं त्याचा संघर्षकाळ, वडिलांचा पाठिंबा, अभिनय क्षेत्र असा सगळ प्रवास कथन केला आहे. प्रसादला संघर्षकाळात त्याच्या वडिलांनी खूप पाठिंबा दिल्याचं त्यानं यामधून सांगितलं आहे. परंतु, त्याच्या बाबांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर तो बरेच दिवस घरीच असल्याचंही म्हटलं आहे. ‘मराठी मनोरंजन विश्व’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये, प्रसाद वडिलांच्या निधनाबद्दल बोलताना म्हणाला, “‘देवयानी’ मालिकेचा शेवटचा दिवस होता. तेव्हा मी आणि बाबांनी ठरवलं होतं की, रत्ननागिरीत आमचं कुलदैवत आहे तिकडे जायचं. तेव्हा बाबा म्हणाले की, तू पुण्याला आलास की, आपण रत्नागिरीला जाऊ.”
“मी म्हटलं, बाबा तुम्ही पुढे व्हा. मी शूट संपलं की, दोन दिवस आराम करतो. कारण- मी सलग काम करतोय. आणि मग सरळ रत्नागिरीलाच येतो. ते म्हणाले ठीक आहे. त्यांच्याकडे पास असल्याने ते ट्रेनने जाणार होते; पण काय झालं कुणास ठाऊक ते त्या दिवशी एसटीनं गेले आणि मला सकाळी ताईचा फोन आला, ती म्हणाली, प्रसाद कुठे आहेस तू? आई रतडेय बाबांना दवाखान्यात अॅडमिट केलं आहे. रत्नागिरीला पोहोचल्यानंतर एसटी स्टॅण्डवर त्यांच्या छातीत दुखायला लागलं. म्हणून मी आईला फोन केला, तर ती म्हणाली, तू जिथे असशील तिथून निघ आणि इकडे ये. मी मुंबईतून निघालो तेव्हा डॉक्टरांचा मला फोन आला आणि ते म्हणाले, प्रसाद लिमये तुमच्या बाबांना हार्ट अटॅक आला होता; पण आम्ही त्यांच्यावर उपचार केले आहेत. आता त्यांची तब्येत बरी आहे. तुम्ही सावकाश या.”
वडिलांबद्दल सांगताना प्रसाद पुढे म्हणाला, “मी डॉक्टरांना म्हटलं मी पोहोचतोच आहे. त्यानंतर दुसऱ्या टोलला पोहोचलो असताना मला डॉक्टरांचा फोन आला आणि ते म्हणाले, मी सीनियर डॉक्टर बोलतोय. तुम्ही जरा गाडी बाजूला घ्या. मी म्हटलं काय झालं, तर ते म्हणाले की, तुमच्या वडिलांना व्हेंटिलेटर लावलं आहे. मी म्हटलं, म्हणजे काय असतं ते. त्यावर ते म्हणाले. त्यांना थोडंसं प्रेशर आलंय म्हणून लावलं आहे. होईल ठीक. काळजी करू नका. त्यानंतर पुन्हा १५ मिनिटांनी फोन आला आणि डॉक्टर म्हणाले की, लिमये, तुमचे वडील वारले. तेव्हा मला कळलंच नाही की, मी काय करू. मी गाडी बाजूला घेऊन १५ मिनिटं स्तब्ध होतो. आणि मला कळेच ना की, नेमकं काय करू. कारण- आपण कधी आपले आई-वडील नसतील, तर काय होईल हा विचारच केलेला नसतो. त्यामुळे करायचं काय.”
पुढे प्रसाद म्हणाला, “१५-२० मिनिटं गाडी बाजूला लावून हायवेवर थांबलो. कोणाला फोन करू, काय करू ते कळतच नव्हतं. नंतर मी माझा शाळेतील मित्र यशला फोन केला आणि सांगितलं की, यश बाबा गेले. त्यालासुद्धा विश्वास बसत नव्हता. त्यानंतर मी व यश रत्नागिरीला गेलो. बाबांना घेऊन आलो. पण, त्या दिवशी मला जाणवलं की, तुमचे वडील जेव्हा जातात तेव्हा कोणी नसतं. बाबा २०१२ ला गेल्यानंतर २०१३ ते २०१४ चं अर्ध वर्ष मी घरी बसून होतो. कारण- आईला कसं सांभाळणार. २०११ ला काम सुरू केलं होतं; पण नंतर लगेच पुढची दीड वर्ष मी घरी बसून होतो. बाबांच्या अकाली निधनामुळे आईसाठी तो काळ फार कठीण होता. त्यामुळे पुढे जेव्हा मी काम सुरू केलं तेव्हा मी अनेकदा पटकन काम संपवून लवकर घरी जायचो. त्यावेळी माझ्या मित्रानं मला खूप मदत केली.”
“माझ्या मित्रानं मला तेव्हा जशी मदत केली तशीच तो अजूनही करत आहे. त्यामुळे आज मी जे काही आहे, ते सगळं त्याच्यामुळे आहे. त्याच्यासारखी तीन-चार माणसं माझ्या आयुष्यामध्ये आहेत. ज्यांनी मला उभं केलं. २४ वर्षांचा असताना बाबा गेल्यानंतर मला जाणवलं की, काही करून मला उभं राहावंच लागेल.”