Apurva Nemlekar on Marriage Institution: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही तिने आजवर साकारलेल्या विविध भूमिकांसाठी ओळखली जाते. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेत ती सावनी ही भूमिका साकारत आहे.
अपूर्वा नेमळेकर सध्या तिच्या भूमिकेमुळे नाही, तर तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. अपूर्वा नेमळेकरने नुकतीच ‘आम्ही असं ऐकलंय’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत तिने सिंगल असण्याबाबत वक्तव्य केले.
सगळ्यांना असं वाटतं की…
अपूर्वा नेमळेकर म्हणाली, “खरं तर माझं लग्न झालं होतं. आता घटस्फोट होऊनदेखील साधारण १० वर्षे झाली आहेत. काही गोष्टी स्वीकारण्यासाठी वेळ लागला. जो विश्वासघात झाला होता, तो पचवण्यासाठी वेळ लागला. आणि त्या सगळ्यातून मला असं वाटतंय की, मला नेमकं काय हवंय आणि काय नको, याची स्पष्टता आली आहे. मला लगेच कोणत्या नात्यात यायचं नव्हतं. त्यामुळे मी बराचसा वेळ घेतला. पण, मला वाटतं की, आता मी तयार आहे.”
पुढे अभिनेत्री म्हणाली, “बऱ्याच लोकांना हे पटत नाही. कारण- सगळ्यांना असं वाटतं की, मी उगाचच काहीतरी सांगते. पण, हो मी सिंगल आहे. प्रामाणिकपणे सांगायचं, तर हे कळलंच नाही की इतकी वर्षे कधी गेली, काही वर्षे दु:खात गेली, काही वर्षे स्वत:ला ओळखण्यात गेली. त्यानंतर आपण सिंगल बरे आहोत, ही मजा यायला लागली.”
अपूर्वा नेमळेकर लग्नसंस्थेबाबत म्हणाली, “माझा लग्नसंस्थेवर विश्वास आहे. जर एका योग्य व्यक्तीबरोबर असेल, तो खूप सुंदर अनुभव आहे. पण, मला असं वाटतं की, लग्न करायचं आहे की नाही, हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रेम, विश्वास, प्रामाणिकपणा हे सगळं तुम्हाला मिळणार आहे का आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं की, तुम्ही समोरच्याला हे सगळं देऊ शकता का? ज्या दिवशी याची जाणीव होईल की, तुम्ही हे सगळं द्यायला आणि स्वीकारायला तयार आहात. तरच तुम्ही ते केलं पाहिजे.”
“उगाचच समाजाचा दबाव आहे, आपल्या वयातल्या सगळेच लग्न करीत आहेत म्हणून कोणी लग्न करू नये. आपल्याला नेमकं काय हवंय आणि आपण हे देऊ शकतो का, आपण एखाद्या व्यक्तीची साथ देऊ शकतो का हे जाणून घेतल्यानंतरच लग्न करावं. नाही तर त्यांच्याबरोबर बऱ्याच लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. पण, माझा लग्नसंस्थेवर विश्वास आहे आणि मला पुन्हा एकदा ते सगळं अनुभवायचं होतं.”
दरम्यान, मालिकांबरोबर अभिनेत्री ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. तिच्या खेळाचे चाहत्यांकडून कौतुक झाल्याचेही पाहायला मिळाले होते.