‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सातत्याने सावनी काही ना काही कटकारस्थान करीत असते. कोमलच्या लग्नाचा डाव फसल्यानंतर आता तिने दोन्ही मुलांच्या आयुष्याचा खेळ सुरू केला आहे. सावनी आणि सागर या दोघांच्या सई आणि आदित्य या मुलांना मुक्ताबरोबर राहायचे आहे. मात्र, सावनीने सागरला फसवून सईची कस्टडी स्वत:कडे घेतली आहे. सई मुक्तापासून दूर होणार असल्याने मुक्ता फार चिंतेत आहे. अशात मालिकेच्या पुढील भागाचा प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये मुक्ताने सावनीला खुले आव्हान दिल्याचे दिसत आहे.

प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुक्ताने सावनीला पोलिसांसमोर खुले आव्हान दिले आहे. सई मुक्ताला रडत रडत विचारते, “तू मला सोडून कुठेच जाणार नाहीस ना?” त्यावर मुक्ता काही बोलण्याआधीच सावनी म्हणते, “तिला जावंच लागेल सईमाऊ.” तसेच सावनी सईला पुढे म्हणते, “तुझ्या काळजाच्या तुकड्याला शेवटी तुझ्यापासून वेगळं केलंच ना.” प्रोमोमध्ये पुढे मुक्ता आणि सावनीला सईपासून दूर करत, “मुलांना सांभाळण्यासाठी मायेचा पदर लागतो. चार दिवसांत माझी मुलगी कायद्यानं माझ्या जवळ असेल”, अशा शब्दांत खुले आव्हान देताना दिसत आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. प्रोमोमधील दाखविण्यात आलेली दृश्ये ११ फेब्रुवारी रात्री ८ वाजता ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत पाहता येणार आहेत.

मालिकेमध्ये सध्या सावनीने सागरला फसवून आदित्यच्या कस्टडीच्या अॅग्रीमेंटवर त्याच्या सह्या घेतल्यात. तसेच आदित्यच्या बदल्यात सई माझ्याकडे राहणार, असा दावा केला आहे. या सर्वांमुळे कोळी कुटुंबात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सईलासुद्धा सावनीकडे पुन्हा जाण्याची इच्छा नाही. सावनी सईला आपल्यापासून दूर करणार या विचाराने मुक्ताही चिंतेत आहे. तिच्या मनातील या भीतीमुळे ती सईला घेऊन घर सोडून निघून गेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुक्ता आणि सई दोघींचेही एकमेकींवर जीवापाड प्रेम आहे. त्यामुळे या दोघींनाही एकमेकींपासून दूर जायचं नाही. सावनीने सईला घेऊन जाऊ नये म्हणून मुक्ता कुणालाही न सांगता तिला घेऊन घरातून बाहेर पडली आहे. सई आणि मुक्ता दोघीही घरात नाहीत हे समजल्यावर कोळी कुटुंबातील सर्वांना काळजी वाटू लागती आहे. अशात नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोत पोलिसांच्या मदतीने सावनी सईला मुक्तापासून हिसकावून घेते, असे दिसत आहे. मात्र, मुक्ताने तिला खुले आव्हान दिले आहे. त्यामुळे सईला मिळवण्यासाठी आणि सावनीला अद्दल घडवण्यासाठी मुक्ता नेमके काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.