सुव्रत जोशी(Suvrat Joshi) व सखी गोखले(Sakhi Gokhale) हे जोडपे लोकप्रिय आहे. सध्या ते त्यांच्या ‘वरवरचे वधू वर’ या नाटकामुळे चर्चेत आहेत. सोशल मीडियावरदेखील हे जोडपे सक्रिय असल्याचे दिसते. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या २०१५ साली प्रदर्शित झालेल्या मालिकेतून सुव्रत व सखी प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या मालिकेत त्यांनी मित्रांची भूमिका साकारली होती. २०१९ मध्ये सुव्रत व सखी यांनी लग्नगाठ बांधली. आता एका मुलाखतीत अभिनेत्याने सखीबरोबरच्या नात्यावर वक्तव्य केले आहे.

थोडीशी धाकधूक…

अभिनेता सुव्रत जोशीने नुकतीच लोकशाही फ्रेंडलीला मुलाखत दिली. या मुलाखतीत सुव्रतने सखीबरोबरच्या नात्यावर वक्तव्य केले आहे. सुव्रत म्हणाला, “पारंपरिक पद्धतीने बायकोने घरात अमुक काम करायची, नवऱ्याने अमुक कामं करायची असतात किंवा संसाराचा गाडा ओढण्यासाठी अमुक अमुक भूमिका तुम्ही पार पाडल्या पाहिजेत; यापेक्षा आमचं लग्न आधुनिक आहे असं मला वाटतं. आमच्यात संसारात जबाबदाऱ्या निम्म्या-निम्म्या वाटून घेतलेल्या आहेत. पण, पारंपरिक अर्थाने त्याची सगळ्याची सरमिसळ झालेली आहे. आम्ही एकमेकांचे जोडीदार आहोत. रात्री थकून भागून घरी आल्यानंतर झोपण्याआधी डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसणं, शेजाऱ्यांना जाग येईल आणि यांच्या घरात काय चाललंय, असा प्रश्न त्यांना पडेल असे आम्ही विनोद करत असतो किंवा एकमेकांच्या खोड्या काढणं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एकमेकांची कळ काढणं किंवा एकमेकांना हसवण्याचा प्रयत्न करणं, हे आम्ही करत असतो. मला वाटतं की, संसार हा नाटकाच्या प्रयोगासारखा असतो. कालचा प्रयोग चांगला झाला म्हणून पुढचं तुम्ही सांगू शकत नाही. रोज उठून नव्याने चांगला प्रयोग करावा लागतो. तसं रोज उठून नव्याने संसाराचा गाडा हा चालवावा लागतो.

लग्नाच्या निर्णयाबद्दल सुव्रत म्हणाला, “लग्न ही मोठी कमिटमेंट असते, त्यामुळे थोडीशी धाकधूक असते. त्यावेळी त्या धाकधुकीला वरचढ होऊ न देता कमिटमेंटची समस्या येऊ न देता आम्ही तो निर्णय घेतला, याचा अतिशय आनंद होतो. जेव्हा मी विशीत होतो, तेव्हा आधी मला असं वाटायचं की जर मी एखाद्या व्यक्तीला कमिटमेंट दिली तर माझं माझ्या कामाकडे, कुटुंबाकडे, वैयक्तिक सुख-दु:खाकडे दुर्लक्ष होईल, मी विचलित होईन, पण आज जेव्हा मी त्या निर्णयाकडे बघतो; तो जेव्हा निर्णय घेतला, त्या दिवसापासून मी विचार करत होतो त्याच्या अगदी उलट झालं. म्हणजे सखी माझी शक्ती बनली, त्यामुळे मी माझ्या कुटुंबाच्या अधिक जवळ गेलो. मला माझ्या आयुष्यात जे काही करायचं आहे, माणूस म्हणून, कारकीर्द म्हणून जे काही मिळवायचं आहे, अगदी वैयक्तिक, आध्यात्मिक पातळीवरसुद्धा त्या सगळ्याला बळकटी मिळाली. कारण एक अशी जागा मला मिळाली, जिथे मी डोळे झाकून विश्वास टाकू शकतो. मला माझा भक्कम आधार सखी आहे, त्यामुळे मला खूप आनंद होतो की मी तो निर्णय घेतला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुव्रत जोशी व सखी गोखले हे त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेदेखील चर्चेत असतात.