'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका आहे. गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेल्या या मालिकेतील कलाकार आता मालिका सोडू लागले आहेत. दिशा वकानी, भव्य गांधी, राज अनाडकत, शैलेष लोढा, नेहा मेहता अशा अनेक कलाकारांनी मालिका सोडली. अशातच या मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांनीही मालिकेला रामराम केला आहे. नुकतीच त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. मालव राजदा यांनी १५ डिसेंबरला त्यांचा मालिकेतील शेवटचा भाग दिग्दर्शित केला. निर्माते व मालव राजदा यांच्यात वाद झाल्याने त्यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मालव राजदा म्हणाले, “१४ वर्ष ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेचं मी दिग्दर्शन केलं. त्यामुळे मी कंम्फर्ट झोनमध्ये गेलो होतो. या मालिकेने मला खूप काही दिलं आहे. प्रसिद्धी, पैसा याबरोबरच माझी धर्मपत्नीही मला याच मालिकेमुळे मिळाली. निर्मात्यांबरोबर वाद झाल्याने मी मालिका सोडली”. १४ वर्षांनंतर दिग्दर्शकाचा ‘तारक मेहता…’ मालिकेला रामराम; समोर आलं खरं कारण दरम्यान, मालव यांची पत्नी प्रिया आहुजा ही मालिकेत एक पात्र साकारणारी अभिनेत्री आहे आणि त्यांची लव्ह स्टोरीही याच मालिकेच्या सेटवर सुरू झाली होती. त्यांची लव्ह स्टोरी जाणून घेऊयात. मालव राजदा सुरुवातीपासूनच मालिकेचं दिग्दर्शन करत होते. अशातच एकेदिवशी मालिकेत अभिनेत्री प्रिया आहुजाची एंट्री झाली. ती रिटा रिपोर्टर ही भूमिका साकारणार होती. शूटींगच्या पहिल्याच दिवशी मालव प्रियाच्या प्रेमात पडले. शूटींग सुरू होतं आणि दिवस पुढे जात होते, कालांतराने मालव व प्रिया मित्र बनले आणि एकत्र वेळ घालवू लागले. दोघंही कामाचंच बोलायचे, पण मालवला आपण आवडत असल्याचा अंदाज प्रियाला आला होता. काही काळाने मालवने प्रियाला प्रपोज केलं, दोघांनी एकमेकांना दोन वर्षे डेट केल्यानंतर 2011 साली लग्नगाठ बांधली. आता दोघांनाही एक मुलगा आहे. "मी आणि प्रिया घरी कामाबद्दल कधीच बोलत नाहीत. मी कधीही प्रियाचे नाव कोणत्याही शोसाठी सुचवलेले नाही," असं मालव सांगतो. प्रिया आणि मालव यांनी त्यांचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य अगदी वेगळे ठेवले आहे. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.