Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिका गेली अडीच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. सायली, अर्जुन, कल्पना, पूर्णाआजी, मधुभाऊ या सगळ्या कलाकारांचा एक चाहतावर्ग तयार झाला आहे. या मालिकेमुळे आणखी एक अभिनेता घराघरांत लोकप्रिय झाला तो म्हणजे चैतन्य सरदेशपांडे. मालिकेत चैतन्य अर्जुनच्या मित्राची भूमिका साकारत आहे.
अर्जुन आणि चैतन्य मधुभाऊंच्या केसचा तपास एकत्र करत असतात. याचप्रमाणे चैतन्य अनेक वर्षांपासून अर्जुनचा खूप जवळचा मित्र असतो. सायलीच्या मदतीसाठी देखील तो नेहमीच तत्पर असल्याचं मालिकेत पाहायला मिळतं. हा अभिनेता वैयक्तिक आयुष्यात सुद्धा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. त्याने नुकताच शेअर केलेला एक डान्स व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.
यंदाचं आयपीएल विराट कोहलीची आरसीबी टीम जिंकल्यामुळे त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. याशिवाय विराट कोहलीचा एक डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर सर्वत्र व्हायरल होऊ लागला. खरंतर या व्हिडीओमध्ये विराट एका वेगळ्याच गाण्यावर डान्स करतोय. पण, नेटकऱ्यांनी लिरिक्स आणि स्टेप्स जुळवून विराटच्या या व्हिडीओला “नटीनं मारली मिठी…” हे सध्याचं ट्रेंडिंग गाणं बॅकग्राऊंडला लावून हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल केला आहे. RCB जिंकल्यापासून नेटकरी विराटचा हा व्हिडीओ रिक्रिएट करून रील्स व्हिडीओ बनवत आहेत.
‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्यला सुद्धा “नटीनं मारली मिठी…” गाण्याची भुरळ पडली आहे. विराटसारखा हुबेहूब लूक करून, खांद्यावर साइड बॅग घेऊन चैतन्य ‘नटीनं मारली मिठी’ या गाण्यावर थिरकल्याचं पाहायला मिळत आहे.
चैतन्यने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “अरे चैतन्य सर मस्त डान्स केलात”, “RCB फॅन्स सध्या असेच खूश आहेत”, “कडक मस्त नाचता…”, “दादा तुम्ही सुद्धा आरसीबी फॅन आहात वाटतं”, “मस्त चैतन्य सर आवडला हा व्हिडीओ” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, चैतन्य महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असलेली ‘ठरलं तर मग’ मालिका दररोज रात्री ८.३० वाजता ‘स्टार प्रवाह वाहिनी’वर प्रसारित केली जाते.