Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन आश्रम केसचा नव्याने तपास करत असून, त्याने चौकशीसाठी प्रियाला नोटीस बजावल्याचा सीक्वेन्स चालू आहे. अर्जुनची नोटीस पाहून प्रियाला खूप मोठा धक्का बसतो आणि ती नेहमीप्रमाणे घरातल्यांसमोर तिची नाटकं सुरू करते. प्रियाने रडून नाटक केल्यामुळे सुभेदारांच्या घरात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सगळेच सायली-अर्जुनवर संतापून त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित करतात.

मात्र, सायली अजिबात खचून न जाता सगळ्या कुटुंबीयांना एक खेळ खेळुया असं सांगते. पुढे, या खेळात सायली-अर्जुन दोघंही आपलं नातं सिद्ध करून दाखवतात. यानंतर प्रतिमा ठामपणे या दोघांच्या बाजूने बोलते. प्रतिमा उघडपणे सायली-अर्जुनची बाजू घेत असल्याने प्रियाचा तिळपापड होतो. एकीकडे सुभेदारांचं मन जिंकण्यासाठी सायलीची कसरत चालू आहे, तर दुसरीकडे अर्जुन आश्रम केस जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे.

मधुभाऊंना काहीही करून या केसमधून निर्दोष मुक्त करायचं असं अर्जुनने ठरवलेलं असतं. आता यासाठी आश्रम केसचा तो नव्याने तपास करत आहे. यादरम्यान अर्जुनच्या हाती मोठा पुरावा लागला आहे. तो विलासचा पोस्टमार्टम रिपोर्ट चेक करतो यामध्ये मृत्यूची वेळ रात्रीचे साडेआठ वाजताची लिहिलेली असते.

विलासच्या फोनवरून, “मधुभाऊंपासून माझ्या जीवाला धोका आहे” असा मेसेज आलेला असतो. हा मेसेज नेमका साडेआठनंतरचा असतो. आता हा मेसेज विलासच्या मृत्यूनंतर कोणी केलाय असा विचार अर्जुन करत असतो. सायली सुद्धा मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा शोध घ्यायला पाहिजे असं अर्जुन-चैतन्यला सांगते.

दुसरीकडे, प्रिया गुपचूप दामिनीकडे पोहोचते आणि तिला सगळी सत्य परिस्थिती सांगते. दोघींच्या चर्चेमध्ये प्रियानेच “मधुभाऊंपासून माझ्या जीवाला धोका आहे” असा मेसेज विलासच्या फोनवरून केल्याचं उघड होतं यामुळे दामिनी प्रचंड संतापते. ती प्रियाला म्हणते, “अगं मूर्ख मुली… विलास मेला आधी…तू मेसेज नंतर केलायस” प्रियाचा खुलासा ऐकून दामिनी डोक्यावर हात मारते.

इकडे अर्जुन, “काही करून त्या मेसेज करणाऱ्या व्यक्तीला शोधायचं म्हणजे मधुभाऊ या केसमधून सुटतील” असं बायकोला सांगत असतो. दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग ३ मे रात्री ८:३० वाजता प्रसारित केला जाणार आहे.