Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन प्रियाविरोधात नवनवीन पुरावे गोळा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता मालिकेत कोर्टरुम ड्रामा सुरू झालेला आहे. त्यापूर्वी अर्जुन प्रियाची मानसोपचार तज्ज्ञांसमोर चौकशी करतो. या चौकशीदरम्यान त्याला अनेक गोष्टी नव्याने उलगडतात.
डॉक्टरांसमोर केलेल्या चौकशीत अर्जुनच्या हातात प्रियाविषयीची कोणती माहिती लागलीये हे जाणून घेण्यासाठी दामिनी अर्जुन अन् सायलीला घरी जेवणासाठी आमंत्रित करते. पण, अर्जुन वेळीच तिचा सगळा डाव ओळखून तुम्हाला सगळं काही कोर्टात कळेल असं सांगतो.
दुसरीकडे, प्रिया कोर्टात जाण्यापूर्वी अर्जुनचं मन वळवण्याचे, त्याला विचलित करण्यासाठी घरात उगाच भांडणं करण्याचा प्रयत्न करते. पण, सायली तिला चांगलंच वठणीवर आणत तिची बोलती बंद करते.
आता कोर्टात सर्वांसमोर मोठा उलगडा होणार आहे. विलासचा खून होण्याआधी आपण साक्षी शिखरेला कधीच बाहेर भेटलो नाहीये असं प्रिया सर्वांना सांगत फिरत असते. अगदी रविराज किल्लेदारांना सुद्धा तिने खोटं सांगितलेलं असतं. आता अर्जुन साक्षी आणि प्रियाची आधीपासूनच मैत्री आहे हे कोर्टासमोर सिद्ध करणार आहे. प्रिया आधी सगळ्यांसमोर हे अजिबातच मान्य करत नाही मात्र, त्यानंतर खोटारड्या प्रियाचा खरा चेहरा उघड करण्यासाठी अर्जुन थेट व्हिडीओ क्लिपच सुरू करतो.
अर्जुनने कोर्टात सादर केलेल्या व्हिडीओमध्ये साक्षी आणि प्रिया हॉटेलमध्ये बसून काहीतरी देवाणघेवाण करत असल्याचं स्पष्ट पाहायला मिळतं. यामुळे अश्विन आणि रविराज खूपच अस्वस्थ होतात. अर्जुन पुढे म्हणतो, “आता हे सिद्ध झालंय साक्षी आणि तन्वी एकमेकींना फार आधीपासून ओळखत होत्या… त्या दोघींमध्ये एक डील सुरू होतं. ते डील काय आहे हे सुद्धा मी आताच सांगणार आहे.”
आता अर्जुनला या दोघींचं नेमकं कोणतं डील समजलंय याचा सस्पेन्स या प्रोमोमध्ये ठेवला आहे. येत्या १३ मे रोजी ( मंगळवार ) रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांना ‘ठरलं तर मग’ मालिकेत हा मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.