‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका १८ मार्च २०२४ मध्ये सुरू झाली होती. तर गेले एक वर्ष या मालिकेतील सर्व कलाकारांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अशातच आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा शेवटचा भाग कधी प्रदर्शित होणार हे अद्याप जाहीर झालं नसलं तरी मालिकेची कथा शेवटाकडे आल्याचं लीला म्हणजेच वल्लरी विराज हिने सांगितलं आहे.

वल्लरीने ‘लोकमत फिल्मी’ला नुकतीच मुलाखत दिली. यामध्ये तिने ‘नवरी मिळे हिटलर’ला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून आता मालिकेची कथा त्यानुसार पुढे जात असल्याचं सांगितलं आहे. यावेळी वल्लरीला “ही तुझी पहिलीच मालिका होती, त्यामुळे यादरम्यान प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया तुझ्यासाठी फार महत्त्वाच्या असतील, पण अशी कोणती एक प्रतिक्रिया किंवा अनुभव आहे जो तुला खूप भावला”, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

‘लोकमत फिल्मी’च्या मुलाखतीत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देत वल्लरी म्हणाली, “एक आठ वर्षांची मुलगी आहे. जिने तिच्या आठव्या वाढदिवशी तिच्या केकवर फक्त माझे फोटो चिकटवले होते. ती भूमिजाच्या (अभिनेत्री भूमिजा पाटिल) ओळखीतली होती. तिने भूमिजाकडे माझ्याशी व्हिडीओ कॉलवर बोलण्याची इच्छा असल्याचं सांगितलं आणि भूमिजाने मला वल्लरी अशी अशी एक मुलगी आहे आणि तिला तुझ्याशी व्हिडीओ कॉलवर बोलण्याची खूप इच्छा आहे असं सांगितलं. मी तिच्याशी जेव्हा व्हिडीओ कॉलवर बोलले, तेव्हा ती खूप रडायला लागली. ती भारावुन गेली होती. पण, नंतर मी तिच्याशी बोलले, आम्ही छान गप्पा मारल्या आणि मग तिने केक कट करीत छान वाढदिवस साजरा केला.”

“तेव्हा मला जाणवलं की, लहान मुलांचं प्रेम काहीतरी वेगळंच असतं आणि माझ्यासाठी ही खूपच छान आठवण आहे.” नवरी मिळे हिटलरला या मालिकेने गेले वर्षभर प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. कलाकारांची तगडी फौज असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यामधून एजे-लीला ही जोडी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडींपैकी एक ठरली. तर लीलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री वल्लरी विराज या मालिकेतून खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वल्लरीची ही पहिलीच मालिका असल्यानं या मालिकेला निरोप देणं तिच्यासाठी कठीण असल्याचं तिने म्हटलं आहे. यासह तिने “कुठलीही गोष्ट हवीहवीशी वाटत असताना संपली की बरं वटतं, जेणेकरून उगाच ती मालिका खेचावी लागत नाही. चांगल्या पद्धतीने गोष्टीचा शेवट होतो,” असं म्हटलं आहे.