Marathi Actress Angry Post On Vivek Agnihotri : आपल्या सिनेमांमुळे कायमच चर्चेत राहणारे विवेक अग्निहोत्री अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळेही येत असतात. अशातच त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे, ते म्हणजे विवेक अग्निहोत्री यांनी नुकत्याच एका मुलाखतीत मराठी जेवण म्हणजे गरिबांचं जेवण असल्याचं म्हटलं.
यावरून सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अशातच एका मराठी अभिनेत्रीनेही त्यांच्या या वक्तव्यावर पोस्ट शेअर केली आहे. ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री नेहा शितोळेने लांबलचक पोस्ट शेअर करत तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये तिने संताप व्यक्त केला आहे.
या पोस्टमध्ये नेहा काही मुद्दे उपस्थित करत म्हणते, “मराठी जेवणाविषयी पर्यायाने संस्कृतीविषयी वाट्टेल ते बोलतोय हा माणूस… पुढे अजुन एका रीलमध्ये हा म्हणतोय की, मी सात्विक अन्न खातो… (याला सावजी खायला घाला आणि एकदा तांबडा-पांढरा रस्सा पाजा.) ‘गरिबांचं’ किंवा ‘किसानांचं’ जेवण म्हणजे वाईट असं म्हणून अन्नाचा, शेतकऱ्यांचा आणि भारताच्या जवळजवळ २५% जनतेचा, जी दारिद्र्य रेषेखाली राहतात; त्यांचा अपमान करतो आहे.”
यानंतर नेहा म्हणते, “आपल्या सगळ्यांची लाडकी पल्लवी जोशी हसून हसून हा विनोद अभिमानाने सांगते आहे आणि मुळात आम्ही भाज्या फक्त उकडत नाही, उकडीचे मोदक सोपे नाहीत किंवा पुरणपोळीही सोपी नाही. ज्यांच्या घरी असं जेवण जेवतात, अश्या मुलीशी कसं लग्न करायचं? हा विवेक अग्निहोत्रीला पडलेला प्रश्न आहे आणि हे सगळं युट्यूबच्या माध्यमातून करोडो लोक बघत आहेत.”
यानंतर नेहाने म्हटलंय, “हा माणूस काश्मीरचं सत्य आपल्या समोर आणतो आहे; म्हणून आपण याला डोक्यावर घ्यायचं? ज्या माणसाच्या भारतातल्या एका राज्याबद्दल, तिथे राहणाऱ्या आणि कष्ट करून कमावून खाणाऱ्या लोकांबद्दल मनात इतका भेदभाव आणि चुकीच्या धारणा आहेत, तो काय दुसऱ्या राज्याचं सत्य सांगणार? आता मराठीचा झेंडा मिरवणाऱ्या सगळ्यांनी याचे सिनेमे बॉयकॉट करायला नकोत का? जसा स्टँड अप कॉमेडियन लोकांना ‘धडा शिकवण्याचा’ आपण प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाल्याची ग्वाहीही दिली. तसं आता यांना ‘वरण भाताची’ किंमत आणि महत्त्व कोण शिकवणार?”
नेहा शितोळे इन्स्टाग्राम पोस्ट
यानंतर नेहाने या पोस्टमध्ये लिहिलंय, “या आणि अशा लोकांमुळे खरंतर मराठी भाषेला, माणसाला आणि पर्यायाने संस्कृतीला धोका आहे. कारण हे पॉवर पोझिशनमध्ये बसून मराठी लोकांविषयी, भाषेविषयी वाईट, निंदनीय आणि अपमानकारक वक्तव्य करतात. त्यामुळे नाही म्हणलं तरी अनेक स्तरांवर लोकांच्या मनात कळत-नकळत परिणाम होतो आणि आपण चित्रपटगृहं मिळत नाही, मराठी अनिवार्य नाही, मराठी कंटेंट ओटीटी स्वीकारत नाही इत्यादी गोष्टीसाठी भांडत बसतो.”
शेवटी नेहा “आपल्याला आपल्यापेक्षा जास्त मोठ्या माणसाशी पंगा घ्यायची भीती वाटते का? त्यापेक्षा दुकानदारांना, कष्ट करून जगणाऱ्या गरीब परप्रांतियांना धमकावणं आणि मारणं सोपं आहे नाही का?” असा प्रश्नही उपस्थित करते. दरम्यान, नेहाने शेअर केलेल्या या पोस्टला अनेकांनी समर्थन दिलं आहे. तिची ही भूमिका योग्य असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.