Why did Priya Marathe hide her cancer: ‘पवित्र रिश्ता’, ‘चार दिवस सासूचे’ आणि अशा अनेक मालिकांमधून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून प्रिया मराठेला ओळखले जाते. अभिनेत्रीचे काही दिवसांपूर्वीच कर्करोगाने निधन झाले.
प्रियाने तिच्या कारकिर्दीत अनेक कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर केली. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत ती अभिजीत खांडकेकरबरोबर प्रमुख भूमिकेत होती. आजारपणामुळे तिने मालिका सोडली होती. मात्र, दरम्यानच्या काळात ती या आजारपणाचा कसा सामना करीत होती, परिस्थितीला कशी सामोरी जात होती, यावर अभिजीत खांडकेकरने वक्तव्य केले आहे.
“जेव्हा चेकअपच्या निमित्तानं काही गोष्टी…”
अभिजीतने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारले की, प्रियाने तिच्या आजारपणाबाबत जेव्हा सांगितलं तेव्हा ती त्या आजाराला कशी सामोरी जात होती? यावर अभिजीत म्हणाला, “मी फार सविस्तरपणे सांगणार नाही. कारण- त्या तिच्या आणि शंतनूच्या आयुष्यातील खूप खासगी गोष्टी आहेत.”
“जेव्हा चेकअपच्या निमित्तानं काही गोष्टी समोर आल्या. आपण सगळंच ऑपरेशन आणि या सगळ्या गोष्टींना खूप घाबरतो. तर त्यावेळी तिनं मला धास्तीनं ही गोष्ट सांगितली की, मला असं असं वाटतं. तर अशा प्रसंगी आपण आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला दिलासा देतो. त्यावेळी मीदेखील तेच केलं. हे नॉर्मल असतं. काहीतरी यावर मार्ग असेलच. तसेही शंतनू आणि तू प्रयत्न करीतच आहात. तू लवकर बरी होशील, असं मी तिला म्हणालो होतो.”
“तिला तिच्या आजारपणाबद्दल कोणाला सांगायचं…”
“त्यावेळी प्रियाचं असं म्हणणं होतं की, तिला तिच्या आजारपणाबद्दल कोणाला सांगायचं नाही. तर अशा परिस्थितीत सेटवर असं होतं की, इतरांना असं वाटायला लागतं की, का बरं एखादी व्यक्ती दमते? का सुट्या घेते? तर प्रियाला ते कळू द्यायचं नव्हतं. तर ते लपवण्यामध्ये मी कायमच तिच्याबरोबर होतो. तर त्या काळात ही परिस्थिती सावरून तिला कम्फर्टेबल करून तिला काम करता येईल, असा आमचा प्रयत्न होता. पण, नंतर तिचं असं झालं की, उपचारांमुळे तिची तब्येत ढासळत होती, हे दिसत होतं. त्याचा तिला त्रासही होत होता.
पुढे अभिजीत म्हणाला, “त्यावेळी प्रिया दोन व्यावसायिक नाटकं करीत होती आणि त्याबरोबर ती मालिकाही करीत होती. त्या मालिकेत ती मोनिकासारखं पात्र साकारत होती. ती मुख्य भूमिका होती. खूप बोलायचे तावातावाने, आक्रस्ताळेपणाचे सीन करायचे असायचे. एका वेळेला ही मुलगी अशा काही ट्रीटमेंट घेऊन की, जिथे माणसं दिवसेंदिवस भर झोपून राहतात. तुमच्यामध्ये ती ताकद नसते. असं असताना प्रिया स्वत: गाडी चालवत येऊन शूटिंग करायची.”
“दोन वाक्यंही बोलणं फार कठीण झालं…”
“दोन व्यावसायिक नाटकं करायची. जिथे नुसती तिची भूमिका उभे राहण्याची नसून पल्लेदार वाक्यं ती बोलत असे. ‘तिला काही सांगायचंय’ आणि ‘अ परफेक्ट मर्डर’ या दोन्हींमध्ये तिनं अत्यंत आव्हानात्मक भूमिका साकारल्या होत्या. इतकं करणारी, रंगभूमीवर रमणारी अशी प्रिया आणि इतकी पल्लेदार वाक्यं इतक्या सफाईदारपणे घेणारी शेवटच्या काही दिवसांमध्ये तिला दोन वाक्यंही बोलणं फार कठीण झालं होतं.
“त्यामुळे हे सगळं आठवून असं होतं की, ती फार पटकन निघून गेली. पण, एक जवळची व्यक्ती म्हणून असं वाटतं की, तिनं अजून थोडं असायला पाहिजे होतं आणि असंही वाटतं की, ती सुटली. अजूनही त्या आठवणी आम्ही आठवतो.”
“मधल्या काळात असं झालं की, जिथे आम्ही ‘तुझेच मी गात आहे’चं शूटिंग करायचो. तिथेच माझं दुसरं एक शूट होतं. आणखी एक सहकलाकार प्रार्थना आम्ही शूटिंगच्या निमित्तानं तिथे गेलो. मी तिथे प्रार्थनाला भेटायला गेलो. तिच्या डोळ्यांत पाणी होतं. मला म्हणाली की, बघ मला कुठली रूम मिळाली. सगळीकडे प्रियाचे फोटो लावलेले होते. तर त्या आठवणी डोक्यातून जाणं काही शक्य नाहीये. ती भावना असते ना की, खरं वाटत नाही की, ती व्यक्ती नाही. ते विचार डोक्यात आहेत”, असे म्हणत प्रियाच्या आठवणी मनात असल्याचे अभिजीतने सांगितले.
दरम्यान, अभिजीत खांडकेकरच्या कामाबद्दल बोलायचे तर, तो ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत आहे.