Lataa Saberwal Separation From Sanjeev Seth: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये राजश्री माहेश्वरीची भूमिका साकारणारी टीव्ही अभिनेत्री लता सभरवालने पतीपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. लता १५ वर्षांच्या लग्नानंतर पती, अभिनेता संजीव सेठपासून वेगळी झाली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. लताबरोबरच संजीव ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये होते.
मालिकेत लता व संजीव यांनी ‘अक्षरा’ म्हणजेच हिना खानच्या आई-वडिलांच्या भूमिका केल्या होत्या. ऑनस्क्रीन पती-पत्नी असलेली ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र आली. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं होतं. आता १५ वर्षांच्या संसारानंतर लता सभरवालने संजीवपासून विभक्त होत असल्याचं अधिकृत निवेदन दिलं आहे.
लता सभरवालची पोस्ट
लता सभरवालने तिच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. “बराच काळ शांत राहिल्यानंतर आता मी जाहीर करतेय की मी (लता सभरवाल) माझ्या पतीपासून (संजीव सेठ) विभक्त झाले आहे. मला एक प्रेमळ मुलगा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मी त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. मी सर्वांना विनंती करते की कृपया माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करा आणि याबद्दल कोणतेही प्रश्न विचारू नका किंवा फोन करू नका.”

लता सभरवालची ही पोस्ट आता सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. १५ वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनीही विभक्त व्हायचा निर्णय घेतल्याने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. आतापर्यंत लता किंवा संजीव दोघांनीही वेगळे होण्याचे कारण उघड केलेले नाही. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि त्यांच्या वैयक्तिक-व्यावसायिक आयुष्याशी संबंधित गोष्टी चाहत्यांसह शेअर करत राहतात.
सेटवर झालेली पहिली भेट
लता व संजीव यांची पहिली भेट ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेच्या सेटवर २००९ साली झाली होती. शोमध्ये दोघांनी पती-पत्नी राजश्री व विशम्भरनाथ माहेश्वरीच्या भूमिका केल्या होत्या. दोघांनी २०१० साली लग्न केलं आणि त्यांना आरव नावाचा एक मुलगा आहे. संजीव सेठ यांचं हे दुसरं लग्न होतं. त्यांचं पहिलं लग्न मराठी अभिनेत्री रेशम टिपणीसशी झालं होतं. या जोडप्याला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.