कलम ३७० रद्द केल्यानंतर आता जम्मू-काश्मीर हा भाग देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर काही काळासाठी येथील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या २२ दिवसापासून जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या सासू-सासऱ्यांसोबत बोलणं न झाल्यामुळे उर्मिला यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

“जम्मू-काश्मीरमधून कलम 370 का रद्द केला हा प्रश्न नाहीये. मात्र सध्या जे काही सुरु आहे ते अमानुषपणे सुरु आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील दूरसंचार सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक जण तेथे राहणाऱ्या आपल्या कुटुंबियांसोबत संपर्क साधू शकत नाहीयेत”, असं उर्मिला म्हणाला.

पुढे त्या म्हणतात, “माझे सासू-सासरे शारीरिकदृष्ट फिट नाहीयेत. ते वृद्ध आहेत. माझ्या सासू आणि सासरे या दोघांनाही मधूमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. असं असूनही गेल्या २२ दिवसापासून आमचा त्यांच्यासोबत कोणताही संपर्क झालेला नाही. माझे पती त्यांच्या आई-वडिलांसोबत संवाद साधू शकत नाहीयेत. सध्या त्यांच्याजवळ उपयोगी औषधे आहेत की नाही”, हेदेखील आम्हाला कळू शकत नाहीये.

दरम्यान, उर्मिला यांनी सोशल मीडियावर त्यांचं मत मांडत कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये जी परिस्थिती ओढावली आहे, त्यावर संताप व्यक्त केला आहे. उर्मिलाने २०१६ मध्ये जम्मू-काश्मीरमधील अभिनेता आणि व्यावसायिक मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.