ज्येष्ठ अभिनेत्री आणि निर्मात्या मंजू सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गीतकार, गायक आणि पटकथा लेखक स्वानंद किरकिरे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. मंजू सिंह यांनी १९७९ मधील 'गोलमाल' चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात त्यांनी रत्ना हे पात्र साकारले होते. त्यामुळे त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. स्वानंद किरकिरे यांनी ट्विटरवर त्यांचा एक फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. या पोस्टसोबत ते म्हणाले, "मंजू सिंह आता आपल्यात नाहीत. दूरदर्शनसाठी स्वराज हा कार्यक्रम लिहिण्यासाठी मंजू सिंह यांनी मला दिल्लीतून मुंबईत आणले होते. त्यांनी दूरदर्शनसाठी एक कहानी, शो टाइम यांसारखे विविध शो केले होते. तसेच ऋषीकेश मुखर्जी यांचा गोलमाल चित्रपटात त्यांनी रत्ना हे प्रेमळ पात्र साकारले होते. आम्ही तुमचे प्रेम कधीही विसरु शकत नाही, भावपूर्ण श्रध्दांजली." स्वानंद किरकिरे यांच्या या ट्विटनंतर अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना अनेकजण व्यक्त करताना दिसत आहे. मंजू सिंह यांचा अल्पपरिचय मंजू सिंह या भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध निर्मात्या होत्या. त्यांनी स्वराज, एक कहानी, शो टाईम इत्यादी कार्यक्रमांची निर्मिती केली होती. त्यांना प्रेमाने ‘दीदी’ या नावाने ओळखले जायचे. मंजू यांनी ‘खेल टॉइज’ या लहान मुलांच्या कार्यक्रमाचे निवेदनही केले होते. जवळपास सात वर्षे या कार्यक्रमाच्या निवेदिका म्हणून त्यांनी काम पाहिले. १९८३ मध्ये त्यांनी शो टाइमद्वारे टेलिव्हिजन निर्मात्या म्हणून पदार्पण केले. त्यांचा ‘एक कहानी’ हा कार्यक्रम अनेक प्रादेशिक भाषांमधील साहित्यिक लघुकथांवर आधारित होता. या कार्यक्रम महिलांच्या कायदेशीर हक्कांवर आधारित होता. ‘कपूर कुटुंबात आता कोणाची जास्त चालते?’ नीतू कपूर म्हणतात “फक्त सूनेचीच…” इतकंच नव्हे तर त्यांनी ह्रषिकेश मुखर्जीच्या गोलमाल चित्रपटातही रत्नाची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेतील अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. मंजू सिंह यांनी अनेक राष्ट्रीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर कार्यक्रम केले होते.मंजू सिंह यांनी लहान मुलांसाठी आणि तरुणांसाठीच्या अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांशी संबंधित विषयात योगदान दिले आहे. २०१५ मध्ये त्यांना कला आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून नामांकित केले होते.