वैजयंतीमाला या ५०-६० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्या केवळ त्यांच्या अभिनय आणि नृत्य कौशल्यासाठीच नाही तर त्यांच्या साधेपणासाठीदेखील ओळखल्या जात. ज्या वेळी त्यांनी चित्रपट जगात प्रवेश केला तेव्हा सुरैया, नर्गिस आणि राज कपूर सारखे टॉप स्टार्स वर्चस्व गाजवत असत. अशा परिस्थितीत स्वतःचे नाव कमवणे अजिबात सोपे नव्हते.

वैजयंतीमाला यांचे आत्मचरित्र ‘बॉन्डिंग: अ मेमोयर’मध्ये अभिनेत्रीने नर्गिस यांच्याबरोबरच्या भेटीचा उल्लेख केला आहे, जी दिल्लीतील एका कार्यक्रमात झाली होती. नर्गिस यांनी वैजयंतीमाला यांच्या उंचीवरून खिल्ली उडवली होती.

वैजयंतीमाला यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, “या कार्यक्रमात राज कपूर, नर्गिस, सुरैया आणि इतर अनेक कलाकार उपस्थित होते. पहिल्यांदाच मी चित्रपटसृष्टीचा भाग झाले आणि त्यांच्याशी संवाद साधला. अरे देवा! इतक्या महान कलाकारांमध्ये दिसणे अविश्वसनीय होते. या काळात मला काही कटू सत्यांनाही सामोरे जावे लागले. लोकांशी संवाद साधल्यानंतर आम्हाला ग्रुप फोटो काढावा लागला. बरेच लोक धावत आले आणि माझ्याकडून ऑटोग्राफ मागू लागले.”

वैजयंतीमाला यांची राज कपूर आणि नर्गिस यांच्याबरोबरची पहिली भेट

वैजयंतीमाला पुढे म्हणाल्या, “मी नर्गिसला राज कपूरला माझ्याकडे जाऊन ऑटोग्राफ देऊ नका असे सांगताना ऐकले. त्याने तिचे म्हणणे ऐकले आणि थेट माझ्याकडे तिचा संदेश घेऊन आला. मी फक्त मान हलवली, पण या वागण्याने मला खूप आश्चर्य वाटले. राज आणि नर्गिसबरोबरची ही माझी पहिली भेट होती.’

अन्नू कपूर यांनीही त्यांच्या एका शोमध्ये हा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते की, वैजयंतीमाला खूप उंच होत्या. कार्यक्रमात जेव्हा सर्वजण ग्रुप फोटोसाठी उभे होते तेव्हा नर्गिस यांनी वैजयंतीमाला यांच्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, “वैजयंती खूप उंच आहे, अगदी खांबासारखी, झाडासारखी.” हे ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि वैजयंतीमाला त्या ग्रुप फोटोमध्ये गुडघे वाकवून उभ्या राहिल्या. घरी गेल्यावर त्या खूप दुःखी झाल्या. मग त्यांच्या आईने त्यांना समजावून सांगितले की तू कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, तुझे काम प्रामाणिकपणे करत राहा. तुझे काम त्या लोकांना तुझे उत्तर असेल.

वैजयंतीमाला यांच्या आई जसं म्हणाल्या तसंच घडलं. १३ ऑगस्ट १९३६ रोजी मद्रास (आता चेन्नई) येथे जन्मलेल्या वैजयंतीमाला यांनी ‘नागिन’, ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘संगम’ आणि ‘साधना’ सारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आणि प्रेक्षकांमध्ये त्यांचे खास स्थान निर्माण केले. ‘देवदास’मध्ये त्यांनी चंद्रमुखीची भूमिका केली होती, जी नर्गिस, बीना रॉय आणि मीना कुमारी यांनी करण्यास नकार दिला होता. या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला होता, परंतु त्यांनी तो नाकारला; कारण त्यांना वाटले की हा पुरस्कार सहाय्यक अभिनेत्रीसाठी नसून मुख्य अभिनेत्रीसाठी असावा. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांना पाच फिल्मफेअर पुरस्कार आणि १९६८ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.